काही वर्षांपूर्वीची गोष्ट. काही कारणाने मला सक्तीची विश्रांती घ्यावी लागली होती. दूरदर्शनवरचे रटाळ कार्यक्रम आणि आपण सातत्याने हरणारे क्रिकेटचे सामने बघून मी बऱ्यापैकी कंटाळलो होतो. त्याच त्याच लेखकांच्या पुस्तकांच्या वाचनातही मन लागत नव्हते. अशातच मिलिंद बोकील या नव्या लेखकाचे 'उदकाचिया आर्ती' या नावाचे पुस्तक हाती लागले. पुस्तकाच्या नावाने कुतुहल चाळवले गेले. सहज म्हणून मी ते पुस्तक वाचायला घेतले आणि पहातापहाता त्यात गुंतत गेलो. दोनएकशे पानांचा कथासंग्रह मी एकटाकी वाचून काढला आणि भारावून गेलो. हे काहीतरी वेगळेच रसायन होते. थोडीशी नेमाडेंची वैचारिक स्पष्टता, थोडीशी अनिल अवचटांची तळमळ आणि तरीही एक संपूर्ण स्वतःची वेगळी अशी शैली. त्या कथांमधले अचूक वैज्ञानिक संदर्भ, कथांचे विषय, त्यातली व्यक्तीचित्रे.. सगळेच अगदी नैसर्गिक आणि आपल्या आसपासचे आणि तरीही काहीसे वेगळेच. चळवळीच्या धुंदीत घरदार विसरून कलंदर,वैराण झालेल्या पण आपल्या मुलाच्या जन्माने आयुष्याला जणू एक हिरवागार कोंभ फुटावा तसे ओलावलेल्या शशिकांतची 'भावी इतिहास' ही कथा, जबरदस्तीने हा देश सोडाव्या लागणाऱ्या धर्मोपदेशक फादरची 'भूमी' ही कथा, अमेरिकन संस्कृतीचा बळी पडून शेवटी नाइलाजाने घटस्फोट घ्यावा लागणारे 'विदेश' या कथेतले सीमा आणि चंद्रशेखर, मेधा पाटकरांवर लिहिलेली 'उदकाचिया आर्ती.. या सगळ्याच कथा मला अतिशय आवडल्या. हा कोण नवीन लेखक हे जाणून घ्यावेसे वाटले. पुढे बोकिलांचा 'झेन गार्डन' हा कथासंग्रह वाचून तर 'उदकाचिया आर्ती' चे अस्सलपण हा 'फ्लूक' नव्हता याची खात्री पटली. हाही कथासंग्रह तेव्हढाच आवडला.