'रात्री अचानक तुम्हाला दचकून जाग येते. मिट्ट काळोख. खोलीत दुसरं कुणीतरी असल्याची तुम्हाला शंका येते. मेणबत्तीच्या दिशेनं तुम्ही हात पुढं करता आणि तुमच्या उघड्या तळहातावर कुणीतरी काडेपेटी ठेवतं ......'
जगातली सर्वात छोटी भयकथा म्हणून ही इंग्रजी गोष्ट प्रसिद्ध आहे. इंग्रजी साहित्यात भयकथा, गूढकथा, रहस्यकथा या साहित्यप्रकारांना दुय्यम समजले जात नाही. मराठी साहित्यात मात्र हे प्रकार रंजनप्रधान आणि म्हणूनच काहिसे उथळ मानले जातात. एकतर जे जे लोकप्रिय ते ते दर्जाहीन असा एक समीक्षकी समज आहे. तो अगदीच गैरवाजवी आहे असे नाही ( कलाप्रकारांची लोकप्रियता आणि त्यांचा दर्जा यावर नुकताच झालेला एक प्रदीर्घ वाद 'मनोगतीं' च्या स्मरणात असेलच!). पण अशा सरसकट वर्गीकरणामुळे या प्रकारचे लेखन करणारे सगळे लेखकही सुमार दर्जाचे मानले जाणे हे बाकी चुकीचे आणि अन्यायकारक आहे. नारायण धारप हे अशा अन्यायाचे (कदचित सर्वात मोठे ) उदाहरण आहे. धारपांचा वाचकवर्ग मोठा असला तरी आपल्या आवडत्या लेखकांच्या यादीत धारपांचा समवेश करणे किंवा धारपांची पुस्तकं विकत घेऊन वाचणं असं करायला मराठी वाचकाला अजून संकोच वाटतो असंच चित्र आहे. 'भयकथा' या प्रकाराची उणीपुरी चाळीस वर्षे 'समर्थ' पणे हाताळणी करूनही धारपांना मराठी साहित्यविश्वात मानाचे पान नाही हे मराठी साहित्याचे आणि पर्यायाने मराठी वाचकांचे दुर्दैव म्हणावे लागेल.
नारायण धारप यांच्यावर प्रामुख्याने भयकथा लेखक असा शिक्का बसला असला तरीही धारपांची प्रतिभा ही त्याहून अधिक कितीतरी क्षेत्रांना स्पर्श करून जाते. गूढकथा, विज्ञानकथा, रहस्यकथा, सामाजिक कादंबऱ्या एवढेच काय पण 'चोवीस तास' नावाचे एक नाटकही धारपांनी लिहिले आहे. स्वतः विज्ञान शाखेचे पदवीधर आणि केमीकल इंजीनिअर असलेल्या धारपांनी विस्तृत वाचन केले आहे. अर्थात धारपांचा 'बायो-डाटा' देण्याचे हे काही स्थळ नव्हे, पण धारपांच्या लिखाणातली तर्कसंगती, काल्पनिक कथा लिहितानाही त्यांनी विज्ञानाशी राखलेले इमान आणि त्यांची वस्तुनिष्ठता ही धारपांची ही पार्श्वभूमी कळाल्यावर समजून येते. याशिवाय कुशाग्र कल्पनाशक्ती आणि मानवी स्वभावाचे, वागण्याबोलण्याचे अचूक आकलन हे कोणत्याही साहित्यीकाला आवश्यक हे गुणही धारपांमध्ये आहेतच.
या लेखात मी फक्त भयकथाकार धारपांविषयी लिहिणार आहे. इतर सर्व रसांप्रमाणेच 'भय' ही मानवी मनाला उत्तेजित करणारी, कदाचित त्यातल्या अनपेक्षिततेच्या छटेमुळे जास्तच उत्कंठावर्धक असणारी भावना आहे. अज्ञाताचे भय - 'फिअर ऑफ दि अननोन' हे समजातील सर्व थरांमध्ये दिसून येते. लहानपणी दाराआड लपलेल्याने ' कूक..' केल्यावर वाटणाऱ्या हव्याहव्याशा भीतीपासून ते रोलर कोस्टरमधील 'स्केरी राइडस' पर्यंत भयाचा माणसाने मनोरंजनासाठी वापर करून घेतला आहे. अमानवी शक्ती किंवा सामान्यांच्या भाषेत 'भूत' ही तर भयाची फारच जुनी संकल्पना. धारपांच्या भयकथेमधल्या अमानवी शक्ती रामसे बंधूंच्या सिनेमातल्या भुतांप्रमाणे हिडीस आणि किळसवाण्या नसतात ( काहीवेळा असतातही! ). बहुदा त्या सर्वसामान्य माणसांप्रमाणे, कधीकधी तर त्या अमानवी असल्याबद्दल चुटपुट लागावी अशा लोभसवाण्या असतात. या शक्तींचा उल्लेख करतांना धारप बऱ्याच वेळा 'ते आलं होतं ...' अशी वगैरे वाक्यं लिहून जातात. धारपांच्या कथेची बांधणी इतकी घट्ट आणि पिळदार असते की वाचक जणू एका अदृष्य(अमानवी?) शक्तीने कथेबरोबर खेचला जातो. आयुष्यभर कटकट्या बायकोच्या वचकाखाला राहिलेली नवरा अखेर मरतो आणि तिच्याच शरीरात शिरून तिच्या देहाचा ताबा घेतो ( 'कवटीतला कैदी'), कुणीतरी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या कवठाच्या झाडाच्या आसपास वावरणारी शक्ती रात्री तिथे येणाऱ्या प्रत्येकाला आत्महत्येला प्रवृत्त्त करते ('कवठीचे वळण'), चंद्रप्रकाशात खून झालेली स्त्री चांदण्यात सर्व सजीवांना आपल्या विश्वात खेचून नेते ('चंद्राची सावली'), विमान अपघातात सापडून आपल्या आईवडीलांना मदतीची हाक देत वेदनेने तडफडत मरण पावलेली छोटी मुलगी आख्खे गावच आपल्या ताब्यात घेते ('सैतान')....धारपांच्या अमानवी सृष्टीची अशी किती उदाहरणे सांगावीत!