या वर्षी विजयादशमी जोरात करायची
गद्य साहित्य
कथा
उषःकाल होता होता...
कंत्राट
ती
बॉम्ब
माणकेश्वराचा पुतळा
मि. क्विन ह्यांचे आगमन
रात्र !
ललित
अतुल अलवानी---एक नक्षत्र
अंकल सॅमला तुमची गरज नाही!
कार्निवालची जत्रा
दंतमनोरंजन
नोकरशाही
सफर लेह-लडाखची
या वर्षी विजयादशमी जोरात करायची
लेख
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म
पाटलांच्या गोष्टी
भाषा... नव्याने अनुभवताना!
लेणी संस्कृत साहित्याची
"अगं मैत्रेयी, देवाला हात जोडलेस का ?"
"सूटकेस कुठेय, चावी कुठे ठेवलीस ग ?"
आईची नुसती लगबग चालू होती...
बाबा गंभीर होऊन पुन्हा पुन्हा माझ्याकडे पाहात होते. " काळजी घे गं..सांगितलेलं सगळं नीट लक्षात ठेव. "
मी हसत होते. किती सूचना या ?
"एकटी पोर चाललीये साता समुद्रापलीकडं..काळजी वाटणार ना गं ..मी तर पाठवणारच नव्हते..ह्यांनी एक ऐकलं नाही.. बापलेक दोघेही सारखेच", आईने सुनावलेच. बाबांचे नेहमीप्रमाणे लक्ष नसते !
बाबांनी मला द. आफ्रिकेत त्यांच्या मित्राकडे पाठवण्यासंदर्भात विचारणा केली. मीही अत्यानंदाने हो म्हणून टाकले. बाबांनी माझ्यावर विश्वास टाकल्याने मला आकाश ठेंगणे झाले होते. एक मुलगा असतानाही मुलीवर अशी जबाबदारी टाकण्याचे धाडस माझे बाबाच करू शकतात. पण आई अगदी विरूद्ध होती. तिने जाईपर्यंत सहजासहजी परवानगी दिलेली नव्हती. खरेतर तिला विचारले असते तर तिने कुणालाच पाठवले नसते. आफ्रिकेबद्दलची तिची मते फारशी चांगली नव्हती. आफ्रिकेत केप टाऊनला बाबांच्या मित्राचा व्यवसाय आहे. मुंबई आणि केप टाऊन अशा दोन्ही ठिकाणी कार्यालये आहेत. व्यवसायाचे बारकावे माहीत करून घेण्यासाठी बाबांनी मला त्यांच्याकडे पाठवायचे ठरवले होते. मुलाच्या ऐवजी मुलीला पाठवणार म्हटल्यावर ते काकाही प्रभावित झाले होते. फोनवरच मला त्यांनी कसल्याही सवलतींची अपेक्षा ठेवू नकोस ही तंबी दिली होती. मलाही ते नकोच होते.
दरम्यान पासपोर्ट, व्हिसा सगळे सोपस्कार उरकत आले होते. व्हिसा मिळाल्यानंतर तर आईचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. जाण्याचे वातावरण तयार झाले होते. खरे तर खूप वाईट वाटत होते. आयुष्यात कधीही विमानात न बसलेली माझी आई आणि अर्थातच मीही..एकदम इतक्या लांब जाणार म्हटल्यावर प्रचंड भावनिक उलथापालथ होणे साहजिकच होते. एकदा जायचे निश्चित झाल्यावर मात्र घरी एकच गडबड सुरू झाली. चकल्या, भाजण्या यांचा कार्यक्रम सुरू झाला. आई ऐकायला तयार नव्हती. तिला विमानात किती सामान नेता येते वगैरे सगळे सांगून पाहिले. बाबांबा माहीत होते आई ऐकणार नाही. माझे सामान मात्र वाढत गेले. कपडे, आवश्यक बाबी, पैसे, चेक्स, कागदपत्रे या जोडीला आईने तयार केलेले जिन्नस दोन बॅगात बसवताना माझी मात्र दमछाक झाली. शेवटी केबिन लगेज मधे अगदीच मोजक्याच वस्तू ठेवून बाकिचे सर्व मोठ्या बॅगेत भरले.
संध्याकाळची फ्लाईट असली तरीही आम्ही सकाळी सकाळीच पुणे सोडले. कितीतरी वेळा असे आम्ही एकत्र मुंबईला गेलो असू. पण आज सर्व संदर्भच बदलले होते. गाडीत नेहमी होणारी अंताक्षरी आज शांत शांत होती. सकाळचे बोचरे वारे आज पिऊन घ्यावेसे वाटत होते. या भूमीवरचे हे वारे माझ्या अंगाखांद्याला स्पर्श करून जाऊ देत...मन सांगत होते. खिडकीतून बाहेरचा निसर्ग डोळे भरून साठवून घेत होते. उजाडायच्या सुमारास आम्ही द्रुतगती महामार्गावर होतो. सकाळची कोवळी किरणे माझ्या चेहर्यावर पडून मला हसवायचा प्रयत्न करीत होती. पक्षांचा किलबिलाट जणू काही मला निरोप देत होता. मीही डोळे किलकिले करून त्यांना टाटा करीत होते.. एकीकडे निसर्गाशी माझे संभाषण असे चालूच होते. दुसरीकडे आईशी बोलत होते. बंधूराज मात्र गप्प होते. त्याला दोन दिवसांपूर्वी रागावले होते...स्वारीची कळी काही खुलत नव्हती. कदाचित बोलण्यासाठी संधीची वाट पाहात असावी स्वारी...
आईला सिद्धिविनायकाला जायचे होते. तिथल्या रांगांची माहिती असल्याने बाबा नकोच म्हणत होते. पण शेवटी आईचा एव्हढातरी हट्ट पुरा करावाच लागला. तिथून येऊनही भरपूर वेळ शिल्लक होता. ओबेरॉय शेरेटनच्या समोर समुदावर जाऊन आम्ही उभे राहिलो. जायची वेळ जवळ येत होती. मन उचंबळून येत होते.. जसजशा भावना गळ्यापर्यंत उसळी घेऊन दाटत होत्या तद्वतच समुद्राच्या लाटाही किनार्याला धडका मारून मला स्पर्शून जात होत्या... याच्याशी माझे विशेष नाते आहे...काय सांगतोस रे बाबा ? मी त्या दर्याला विचारले. जणू काही दोन ठिकाणांना जोडणारा दुवा आहे मी असेच तो सांगत असावा. मला त्याचा खूप आधार वाटला. क्षितिजाकडे एकटक पाहताना अचानक क्षितिज वर उचलले जात असल्याचा भास झाला. डोक्यावरचा तो चैतन्यगोळा जणू स्थिर होता आणि धरणी त्याच्याकडे मान वर करून कलते आहे असेच वाटले क्षणभर...आज मी तुला अंतर देणार नाही...भास्कराला मी म्हटले.
विमानतळावर पोहोचलो तेव्हा तीन तास शिल्लक होते. आताच सुरक्षा तपासणी पूर्ण करून घ्यावी या उद्देशाने बाबांनी घाई करायला सुरूवात केली. खरेतर माझे पाय जड झाले होते... मन भरून येत होते. आईच्या खांद्यावर डोके ठेवून रडावे असे वाटत होते.
अचानक खांद्यावर हात पडला...माझा लहान भाऊ होता. काही न बोलता त्याने मला मिठी मारली. काही बोलायची आवश्यकताच नव्हती. डोळ्यातून वाहणारे अश्रूच सगळे बोलून गेले. आई पदराला डोळे पुसत होती. तिच्या खांद्यावर डोके ठेवायची हौस भागवून घेतली. ही सुरक्षित आणि हक्काची जागा सोडून मी लांब चालले होते. अज्ञात अशा प्रवासाला निघाले होते..!
बाबांच्या पाया पडताना त्यांच्या गळ्यातून निघालेला तो जडभरल्या आवाजातला आशीर्वाद मला एकदम बालपणीच्या हक्काच्या जगात घेऊन गेला. एका क्षणात कितीतरी वर्षे पाठीमागे जाऊन मी बाबा म्हणून हंबरडा कधी फोडला मलाही कळाले नाही..
"बाई ग...या वर्षी तुझ्याशिवाय गौरी-गणपती... दसरा......" आईला पुढे बोलवेना !
बाबांनी तिला थोपटले.
"आपली पोर सीमोल्लंघनाला निघालीय...या वर्षी विजयादशमी जोरात करायची आपण."
कुणीच काही बोलले नाही. घामट झालेल्या अंगाला वाराही शिवत नव्हता. तोही कुठतरी आळसावल्यासारखा पडून राहिला होता...
आणि आमच्या उड्डाणाची उद्घोषणा झाली. मनाचा हिय्या करून आणि संगमरवरी पुतळा होत चाललेल्या पायांना बळेच ओढत मी सुरक्षासीमा उल्लंघून मागे पाहात हात हलवत राहिले. डोळ्यात प्राण आणून मागे पाहात मी चालले होते. आईबाबांना पुढे येऊ दिले जात नव्हते. कॅमेरा बॅगेत असला तरीही हा क्षण माझ्या मनात खूप खोलवर कोरला गेला आहे. टाचा उंच करून काचेतून पाहणारी आई आणि अखेरच्या क्षणी डोळ्याला हात लावलेले बाबा !!
आज केपटाऊन मध्ये केप ऑफ गुड होपच्या या प्रसिद्ध स्थळी बसून समुद्राकडे पाहताना हा चित्रपट डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा जसाच्या तसा तरंगून जातो. इथे म्हणे दोन समुद्र एकमेकांना मिळतात. निळ्या आणि हिरव्या पाण्याचा संगम इथे होतो असे म्हटले जाते. काहींना मात्र तसा फरक कधीच दिसत नाही. कसा दिसणार ? निळ्या पाण्याच्या समुद्राचे नाव हिंदी महासागर आहे म्हणताना त्यांना काहीच फरक पडत नाही. मला मात्र ती जलरेषा स्पष्ट समोर दिसते. दोन्ही रंगही वेगवेगळे स्पष्ट दिसतात. इथे सुटीच्या दिवशी येऊन समुद्राकडे पाहतांना किती आश्वस्त वाटते. मरीन डाईव्हला तो मला काय सांगत होता हे आता चांगलेच कळाले होते. माझ्या मातृभूमीच्या लाटा तो इथे माझ्यासाठी घेऊन येत होता... इतक्या उंचावरूनही त्या लाटांचा स्पर्श मला जाणवत होता...
माघारी जाणार्या लाटांना स्पर्शण्यासाठी माझा हात नकळतच पुढे होतो... मी परत येते आहे...हा निरोप सांगण्यासाठी आजही मोबाईलपेक्षा मला त्याचाच आधार जास्त वाटतो...!!
या विजयादशमीला दोन्ही सीमांना जोडणारा खार्या पाण्याचा हा दर्या बाबांच्या डोळ्यातील आनंदाश्रूंची आठवण करून देताना वार्यासोबत त्यांचे शब्द माझ्यासाठी घेऊन येतो...
"आपली पोर सीमोल्लंघनाला निघालीय...या वर्षी विजयादशमी जोरात करायची आपण."
टचकन डोळ्यात तरारलेल्या थेंबांना मोकळी वाट देत मी तिथून उठते. मावळतीच्या किरणांचा खेळ सुरू झालेला असतो एव्हाना. आता क्षितिजाकडे पाहतानाही धरणी वर येताना दिसत नाही. दिसतो तो पाण्यात डुंबणारा तांबूस गोळा... गळ्यात दाटलेला हुंदका घेऊन मी पुन्हा माघारी फिरते...दिवस मोजत !