बजाचा बाजार

बोचरेवाडीचा बजा बुधवारच्या बाजाराला निघाला. त्याच्या शेतातला आंबेमोहोर अप्रतिम होता. तो खरेदी करायला भारंभार पैसे मोजायला लोक तयार असत. पण बजाचे डोके नेहमीच तिरके (खरे तर उलटे) चालत असे. "तांदूळ विकायचाच नाही" इथपासून "तांदळाच्या एका दाण्याला पाऊण पैसा पडेल. दाणे मोजा नि त्याप्रमाणे पैसे देऊन चालू लागा" इथपर्यंत काहीही तो सहज भकत असे.

यावेळेस त्याने निघताना एका मोठ्या, वीस किलो धान्य मावेल एवढ्या पोत्यात पाच किलो तांदूळ घातले. मग ते पोते त्याने तांदळांना जराशी वर जागा ठेवून सुतळीने करकचून बांधले. जवळजवळ दोन तृतियांश पोते वर रिकामे उरले. त्यात त्याने पाच किलो गहू भरले आणि परत पोत्याचे तोंड घट्ट बांधले. मधले बांधणे चांगले मजबूत होते, गव्हाचा एकही दाणा खाली तांदळात जाणार नाही असे.

हे दोन मिनी-पोत्यांचे झेंगट घेऊन तो बाजारात पोचला.

बजाने तांदूळ विकायला आणले आहेत म्हटल्यावर लगेच लोकांची रीघ लागली. पण उत्साहात आलेले सर्वजण बजाची अट ऐकताच अचानक थोबाडीत बसल्यासारखे चालू लागत.

बजाची अट अशी होती - बजाचे पोते कुठल्याही प्रकारे न कापता, न फाडता जो कोणी फक्त तांदूळ घेईल त्याला ते फुकट मिळतील. पण बजाला वरच्या 'कप्प्या'त ठेवलेले गहू सगळेच्या सगळे परत पाहिजे होते. आणि तांदूळ घेणाऱ्या व्यक्तीने स्वतःच्या एक पोत्याखेरीज कुठलेही इतर साधन वापरायचे नव्हते. म्हणजे, एखाद्या मोठ्या परातीत आधी गहू काढून घेतले, मग तांदूळ आपल्या पोत्यात घेऊन मग गहू परत बजाला दिले हे चालणार नव्हते. किंवा गहू आणि मग तांदूळ एकत्र आपल्या पोत्यात घेतले, आणि गहू एकेक दाणा निवडून परत दिला (बजाच्या शेतातला आंबेमोहोर, आणि तोही फुकट मिळणार असेल तर, हे किचकट काम करायला लोक तयार होते) असेही चालणार नव्हते. घेणाऱ्या व्यक्तीकडे एकच पोते असणे अपेक्षित होते. त्यामुळे एका पोत्यात गहू घेतले, दुसऱ्यात तांदूळ, आणि मग गहू परत केले असेही चालणार नव्हते.

गोचरेवाडीचा गजा असा हार मानणाऱ्यांतला नव्हता. आणि बजाचा तो शाळूसोबती. त्यामुळे बजाने घातलेले कोडे आपल्याला सोडवता आलेच पाहिजे या ईर्ष्येने तो हट्टाला पेटला. हातात वीस किलोचे रिकामे पोते आणि सुतळीचा गुंडा घेऊन हिंडताना त्याला उत्तर सापडले.

बजाला मुकाट पाच किलो तांदूळ फुकटात द्यावे लागले.

गजाचे उत्तर काय होते?