माथ्यावरचा सूर्य आता ढळला होता. संध्याछाया पसरू लागल्या होत्या. काळ्या मार्गावरून सावल्या सरकत होत्या.
सूर्यप्रकाशात अडथळा आणणे याखेरीज मानवी शरीराला काहीही महत्त्व नव्हते. त्यामुळे त्या सावल्यांवर मानवाचा, त्याच्या संतुलनाच्या अट्टाहासाचा, त्याच्या कोत्या विचारशक्तीचा काहीही अधिकार नव्हता. स्वतःच्या अज्ञात तत्त्वज्ञानाला अनुसरून त्या सावल्या पसरल्या होत्या.
ती सावली मानवी आकृतीसारखी भासत होती. पण डोके सोडल्यास बाकी सर्व भाग प्रमाणाबाहेर ताणले गेले होते. ती सावली एका विचित्र आकृतीवर आरूढ होऊन सरकत होती.