शिशिरचे लग्न तर झाले. आता परत जाण्याची घाई करण्याचे कारण नव्हते. शिशिर आणि ऍनला कितीही बाता मारल्या तरी पुण्याला माझी वाट पाहत एकही प्रॉजेक्ट बसलेला नव्हता. आणि बाता मारून फायदा नव्हता, ते दोघे मला (विशेषतः शिशिर; पण एक-दोन भेटीतच ऍननेदेखील ते साध्य केले होते) आरपार वाचू शकत होते. त्यामुळे 'येतो येतो' अशा चार महिने मारलेल्या थापांचा त्यांनी पुरेपूर वचपा काढला आणि कमीत कमी दोन आठवडे असा माझा मद्रासमध्ये राहण्याचा कालावधी निश्चित करून टाकला.
मीही ही उन्हाळी सुट्टी मजेत घालवायचा चंग बांधला. पण हळूहळू अडचणी लक्षात येऊ लागल्या. शिशिर, ऍन, अजय आणि सरकीलाल सगळे PhDसाठी तिथे जमलेले होते. मीच एकटा (इथेही) बिनकामाचा होतो. पुण्यात कामात असल्याचे बहाणे तरी करता येत (विशेषतः कुणी "असली कसली अवदसा आठवली रे तुला? किमान तो अभ्यासक्रम पूर्ण तरी कर, आणि मग कर काय करायचे ते" असे उपदेशामृत पाजायला आले की) पण इथे काय करणार? साधे बाहेर पडायचे म्हटले तरी भाषेची अडचण.