लग्न ठरल्यावर दोघांनी एका गावात असणं यात काही औरच मजा असते!! तुम्ही फ्रिक्वेण्ट्ली भेटू शकता आणि एकमेकांना चांगल्या रितीने समजून घेऊ शकता. त्यामुळे लग्नानंतरचा जो एकमेकांना ओळखण्याचा, एकमेकांच्या वृत्ती, आवड, निवड, स्वभाव, विचार करण्याच्या पद्धती, आणि कुठल्याही गोष्टीवर रीऍक्ट होण्याच्या पद्धती या गोष्टी जाणून घेण्याचा काळ कमी होतो आणि तुम्ही डोक्यावर अक्षता पडल्यावर ताबडतोब एका मॅच्युअर आणि १००% परस्पर सामंजस्य असलेल्या, एकमेकांविषयी खूप ओढ आणि आपुलकी निर्माण झालेल्या नात्यामध्ये प्रवेश करता. आणि शिवाय लग्न ठरल्यावर होणाऱ्या बायकोसोबत मनमुराद फिरण्याचा, सिनेमा बघण्याचा, तिच्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्याचा, तिला स्पर्श करण्याचा, हळूच भुरभुरत्या पावसात तिचे चुंबन घेण्याचा आणि आकंठ तिच्या प्रेमात बुडाल्यावर ती सोबत नसतांना मनाच्या सांदीकोपऱ्यात तिचाच विचार करण्याचा, दिवसभर तिला भेटण्याचा विचार करण्याचा आणि तिच्या फक्त तुमच्यासाठी म्हणून असलेल्या नितळ नजरेचा अनुभव घेण्याचा जो आनंद असतो तो इतर कुठल्याही सुंदर अनुभवांपेक्षा श्रेष्ठ असतो!