आणि एक दिवस जिलब्या गणपतीला प्रदक्षिणा घालताना अचानक त्यांना एक खल्लास आयडिया सुचली...
त्याचं झालं असं की जिलब्या गणपतीला येताना ती दारात बसलेल्या त्यांच्या नेहमीच्या हार - फुलं वाल्याकडे गेले होते. नेहमीसारखाच गणपतीला हार घेतला (हल्ली चिंट्या मिनीला गजरा घ्यायच्या ऐवजी देवाला हार घ्यायला लागला होता.. कालाय तस्मै नमः हेच खरं!) तर हार घेताना असं लक्षात आलं की आज सगळे बोगनवेलीच्या फुलांचे हात आहेत, नेहमीचे शेवंती, गुलछडी असे नाहीत. म्हणून त्यांनी हारवाल्याला विचारलं की का रे बाबा हे असे हार का? तर त्यानी उत्तर दिलं 'अवो सायेब आजकाल ह्याच फुलांना ज्यादा डिमांड हाये. आपल्याला काय, कष्टमर ज्ये मागतो त्ये आपन बनवतो. हे असंच चालतं बगा बाजारात. बोगनवेल तर बोगनवेल, उद्या कुनी सदाफ़ुलीचे हार मागितले तर आपन सदाफुलीचे बनवू की'