"गंधात न्हायचे होते,
रंगांत ल्यायचे होते.
फुलण्याचि आस असताना,
निर्माल्य व्हायचे होते.
काही नाती ही असतातच मुळी अशी ! फक्त एका दिवसासाठी, किंवा अगदी काही क्षणांपुरतीचसुद्धा! पण काळाच्या दोरखंडांनी त्यांना जेरबंद करायचं नसतं, तर श्वासांत त्यांचा सुगंध भरून जगायचं असतं. अशा नात्यांचे सुगंधी श्वास घेतल्याशिवाय जगण्याला किंमत येत नाही; आणि कदाचित निर्माल्य झाल्याशिवाय त्यांच्या सुगंधाची किंमतही कळत नाही. आणि आपण ज्यांना 'कायमची' नाती म्हणतो, त्यांचं अस्तित्त्वसुद्धा 'कायम' म्हणजे काय किंवा किती यांवरच अवलंबून असतं. वेदमंत्रांच्या जयघोषात, अग्नीला साक्षी मानून सप्तपदी चालणाऱ्यांची पावलं जेव्हा काडीमोड घेण्यासाठी कुटंब न्यायालयांकडे वळतात, तेव्हा 'कायमचं नातं' हा नक्की काय प्रकार आहे, असाच प्रश्न पडतो. त्यावेळी 'नातं' म्हणजे नक्की काय, कोणात असतं, का, कशासाठी, कशामुळे असे एक ना अनेक प्रश्न आगंतुकासारखे प्रकट होतात.