ध्वजाचा सन्मान आणि आपली जागरुकता

पुढच्याच महिन्यात आपण स्वातंत्र्यदिन साजरा करू. या व २६ जानेवारीच्या वेळी दरवर्षी शाळाशाळांमधून ध्वजवंदन केले जाते. कागदी भिरभिऱ्याला ध्वज लावून सायकल-दुचाकींवर लावून दोन दिवस ध्वजाच्या प्रेमाचा आविष्कार केला जातो. मुलांनाही शाळांकडून ध्वजाच्या लहान लहान प्रतिमा गणवेशांवर लावण्यासाठी दिल्या जात असतील. मला एक गोष्ट अनेकदा जाणवली, की स्वातंत्र्यदिन वा प्रजासत्ताक दिन झाल्यानंतर तेच भिरभिऱ्याचे ध्वज, लहान लहान ध्वजप्रतिमा रस्तोरस्ती लोळत असतात. पायदळी तुडविल्या जातात. हा ध्वजाचा सन्मान नक्कीच नाही. दोन-एक वर्षांपूर्वी दुरदर्शनवरून कोणी देशपांडे नावाचा मुंबईतील तरूण हे रस्त्यावर पडलेले ध्वज गोळा करून त्याची ध्वजसंहितेच्या नियमानुसार योग्य ती विल्हेवाट लावण्याचे काम गेली दोन-तीन वर्षे करीत असल्याचे वृत्त ऐकले होते. विल्हेवाट लावण्याचा मुद्दा नंतरचा आहे. मुळात ध्वजाचा सन्मान राखला जाईल, यासाठी काय करायला हवे हा विषय महत्त्वाचा आहे. शाळा-शाळांमधून प्रचार तर करता येईलच, पण अजून काय करता येईल?