कामथे काका - अंतिम भाग (संपूर्ण)

                          आता फक्त एकच दिवस मध्ये होता. इन्स्पे. डावले, खुशीत असले तरी केसमधले इतर शासकीय उपचार बरेच बाकी होते.  

त्यांच्या अंदाजाप्रमाणे गुड्डी  मारहाणीपुढे फार टिकला नाही. त्याने सगळं काही पोपटासारखं बोलण्यास सुरुवात केली. त्याचं या धंद्यातलं आगमन ते पार अगदी हॉटेल डिलाइट मधून पळून पकडला  जाईपर्यंत त्याने सगळ्याच गोष्टी सांगितल्या. त्यात श्रीपतरायला मारण्यापर्यंतचा तपशीलही  आला. जे काकांना माहीत नव्हतं. तो फारसं काही करू न शकणाऱ्यांपैकी होता. त्याला दुसऱ्याच्या आधाराची सवय होती.  त्यामुळे तो  ऐष प्रथम आणि त्यासाठी लागली तर गुन्हेगारी अशा तत्त्वाचा माणूस होता. अर्थातच सरळ मार्ग त्याने कधीच वापरला नव्हता आणि वाईट मार्गाचाही अवलंब दुसऱ्याच्या आधारावर जितका कमी करता येईल असा तो करीत असे. थोडक्यात तो आळशी होता. त्यामुळे तो अंग सांभाळून होता. असे लोक इतके हलके गुन्हे करतात की लोकांच्या लक्षात येत नाहीत , त्यामुळे ते साधारण जीवन जगू शकतात. त्यांना पोलिसांचाही त्रास फारसा होत नाही ,जोपर्यंत मोठा गुन्हेगार सापडत नाही ,ज्याच्या संरक्षणाखाली गुड्डीसारखे लोक गुन्हे करतात. मग त्याने सांगितलेल्या वाळकेश्वरच्या पत्त्यावर  सर्च वॉरंट घेऊन जाऊन तपास करणं गरजेचं होतं. त्याबद्दल काकांनी फक्त ऐकलं होतं.खरंतर त्यांना किशाने नरिमन पॉइंटचा फ्लॅट म्हटलं होतं.  ते घाबरले होते म्हणून म्हणा किंवा  त्यांना आठवलं नाही म्हणून म्हणा त्यांनी वाळकेश्वर  सांगितलं होतं. आपल्याशी किशा खोटं बोलला असावा. पण गुड्डीनेही वाळकेश्वर सांगितल्याने त्यांचा ताण कमी झाला. मग नरिमन पॉइंटचा फ्लॅटही होता की काय कोण जाणे. नशीब गुड्डीला  तसं काही माहीत नव्हतं. नाहीतर विनाकारण काका संशयाच्या भोवऱ्यात सापडले असते. त्यांची सुटकाही लांबली असती.   ....... त्यांना किशाने फ्लॅटचा  पत्ता देण्याच्या आतच टोळीची दशा झाली होती. मग काकांनी सांगितलेला मुंब्र्याचा  जबाबी चाचा तेवढा शिल्लक राहत  होता.पण त्याच्याशिवाय केस  रंगवता येत असल्याने डावलेंनी केस चालू होईपर्यंत त्याचा शोध सावकाश घेण्याचं ठरवलं.  शनिवारच्या दिवशी त्यांनी वॉरंट मिळवलं. आणि रात्री शेवटचा प्रयत्न म्हणून परत सगळ्यांना आत घेतलं आता मात्र त्यांनी मारहाण केली नाही, तर त्या सगळ्यांनाच किती भयंकर शिक्षा होऊ शकते याची कल्पना दिली. सोल्या तेवढा बोलला, " साहेब जरा माझा बी विचार करा की  माफीचा साक्षीदार म्हणून. "   पण त्याला फार कमी माहिती असल्याचं डावलेंनी त्याला सांगितल्याने तो निराश झाला.  रविवारचा दिवस  केसच्या तपासावर फायनल शिक्का मोर्तब करणारसं दिसत होतं. रविवारी सकाळी वाळकेश्वर फ्लॅटमध्ये जाण्याचं ठरलं. तरी सगळा दिवस डावलेंचा अहवाल तयार करण्यात गेल्याने डावले आणि  पार्टी काकांसहित रात्री 
आठ साडेआठच्या सुमारास वाळकेश्वरच्या सुमती सोसायटीच्या जवळ पोहोचली. गेटवरचा नेपाळी त्यांना पाहून अचंबित झाला आणि काहीसा घाब्रलाही. त्याला कळेना पोलिसांना कोणी बोलावलं. डावलेंनी फ्लॅट नंबर १२०३ सांगितल्यावर मात्र तो म्हणाला, " शाब वहां तो कोई नही रहता. वो तो चार पाच सालसे बंद पडा है. मग डावल्यांनी विचारल्यावर तो फ्लॅट कोणाच्या मालकीचा आहे ते त्याने सांगितले. तो कोणी 
फारुख रझा नावाच्या असामीच्या नावाचा होता. पण फारुख रझा या माणसाला आजपर्यंत कोणीच पाहिले नसल्याचे त्यांना कळले. मग लवकरच सोसायटीचे सेक्रेटरी आले त्यांना विचारल्यावर कळलं की रजिस्ट्रेशनच्या वेळी त्यांना जे पाहिलं होतं, ते परत त्यांनी त्याला कधीही पाहिलं नव्हतं. पण सोसायटीचे मेंटेनन्स बिल मात्र वेळेवर भरले जात होते. त्यांना डावलेंनी किशाचा फोटो दाखवून हाच तो माणुस का हे विचारल्यावर ते हो म्हणाले. सोसायटीच्या ऑफिसमधल्या करारनाम्याच्या  प्रतीवरचा किशाचा फोटो पाहून त्यांनी खात्री करून घेतली. तेव्हा मात्र सेक्रेटरी म्हणाले, " आप ऐसे कैसे सर्च  कर सकते है ? " त्यावर डावले म्हणाले, " आप चाहिये तो कंप्लेंट करो. और ये देखो सर्च वॉरंट, और आप ज्यादा बात करेंगे तो  ये फारुख रझासे आपका ताल्लुक है ऐसा  मै समझूंगा , चलेगा आपको " त्यावर तो काही न बोलता निघून गेला. 
तेवढ्यात वॉचमनने बरोबर येण्याबाबत विचारले. तेव्हा जास्त वेळ जात असलेला पाहून डावले चिडले आणि म्हणाले, " वहां पार्टी है क्या ? "
मग मात्र तो चुपचाप निघून गेला. लिफ्ट पकडून सगळेच जण बाराव्या मजल्यावर आले. एका मजल्यावर तीन फ्लॅटस असलेली ती बिल्डिंग होती. प्रथम आपापली पिस्तुले काढून कोणताही धोका न पत्करता त्यांनी बरोबर आणलेल्या चावी तज्ज्ञाला कुलूप उघडावयास सांगितले. 
आत शिरल्यावर त्यांच्या लक्षात आलं की इथे कोणतेची फर्निचर नव्हते. की कोणी राहिल्याच्या खूणा होत्या. तो एक चार बेडरूम हॉल कीचनचा प्रशस्त फ्लॅट होता. सर्वच खोल्या रिकाम्या होत्या. तिथे आतल्या एका खोलीत मात्र एक कपाट होतं. तिथे लॉकर उघडल्यावर काकांचा आणि 
किशाचा असे दोन खोटे पासपोर्ट होते. त्यावर त्यांचं नाव मात्र कामथे ऐवजी " जांभळे " असं लिहिलेलं आढळलं. मात्र तिथे व्हिसा नव्हता. 
खोटा व्हिसा बनवता आला नसावा. एक भरलेलं पिस्तुल आणि एका मोठ्या पाकिटात एक लाख रुपये ठेवलेले आढळले. इथेही काकांना किशाने फसवल्यासारखं वाटलं. व्हिसा नव्हताच. ते काहीही बोलले नाहीत. रितसर पंचनामा करून साऱ्या गोष्टी ताब्यात घेऊन डावले साहेब 
आल्या मार्गाने परत निघाले . 
                                              आता केस अगदी एखाद्या गऊ बाईसारखी सरळ झालेली होती.दरोड्या संबंधीत सगळे धागे आता गुंफ़ले गेले  होते. पो. स्टेशनला डावले रात्री अकरा वाजता आले. मग काकांना म्हणाले, " बहुतेक तुला जामीन लागणार नाही, उद्या पासून तू सुटशील. फक्त केस पूर्ण होईपर्यंत कुठेही जाऊ नकोस. " त्या रात्री काकांना ते पोलिसस्टेशनमध्ये असूनही शांत झोप लागली. बरेच दिवसात त्यांना सुटल्यासारखं  वाटू लागलं. पण त्यांनी त्यावर स्वप्नरंजन  केलं नाही. कारण स्वप्नरंजन आजपर्यंत त्यांना घातक ठरलं होतं. त्यांना परत एकदा आपल्या  निकालाची आदली रात्र आठवली. आता रोहीणी नव्हती आणि साधना  असून नसून सारखीच होती. त्यांचा एक मित्र त्यांना सांगत असे त्याची त्यांना अचानक आठवण झाली. "क्रिमिनल केस आहे ना बरोबर कोणीही जवळचा नातेवाईक घेऊन जाऊ नकोस. विरुद्ध निकाल लागतो. आणि त्याच्या समोर आपली शोभा होते ती  वेगळीच. आपण एकटे असलो की आपला हीनदीनपणा पाहायला कोणीही नसतं हे लक्षात ठेव. "   त्यांना आता ते अनुभवाचे बोल वाटत होते.  शिक्षा झाली तेव्हा रोहिणी बरोबर होतीच की. आता फक्त एकच जुना प्रश्न त्यांना राहिला होता. सुटल्यावर रमेशच्या घरी कसं जायचं . नीता त्यांना घरात घेणार नाही हे नक्की होतं. पण तिने एकदा हाकललं की मग 
तेच निमित्त धरून ते साधनाला कायमचं राहण्याच्या दृष्टीने विचारता येईल. आता कदाचित तिचा लग्नाला विरोध होणार नाही. काकांना 
साधनाशी लग्न या विचारानी एवढं झपाटलं होतं की साधारण आयुष्य जगण्याची त्यांना अतिशय घाई झाली होती. आणि गेल्या सात आठ वर्षात पाहिलं असतं तर त्यांचा आग्रह योग्य होता अस कोणीही म्हंटलं असतं. पण आजूबाजूचे सगळेच लोक तसे नसतात. ज्या व्यक्तीबरोबर राहायचं , तिचाच मुळात विरोध असेल तर  असल्या आग्रहाला कोण विचारणार. असले विनाकारण  ओघळणारे विचार त्यांना परत परत अस्थिरतेच्या 
जगात घेऊन जात होते. तरीही त्यांना सुटकेच्या विचाराने झोप लागली. उद्याचं उद्या पाहू असा त्यांनी विचार केला. त्यांना अजून हे माहीत नव्हतं की घरी रमेश आणि निलू पण आले होते. मग तर ते जास्तच अस्वस्थ झाले असते. अज्ञानात सुख असतं हेच खरं. ............
सकाळ झाली . आरोपींना घेऊन इन्स्पे. डावले , नेटके, देखणे कोर्टात जाण्यास निघाले. तत्पूर्वी अहवालाची प्रत उपायुक्तांकडे त्यांनी
पाठवली. आता त्यांना रिमांड नको होता. कोर्टात उभे केल्यावर काकांना वेगळे बसवले गेले. सरकारी वकीलांनी सविस्तर वर्णन करून पोलिसांनी घेतलेल्या कष्टाचे यथोचित गोडवे गाइले. लवकरच कोर्टाने पुढील कारवाईसाठी म्हणजे केस उभी करण्यासाठी तारीख दिली. 
काकांचं नाव अधिकृत रित्या माफीचा साक्षीदार म्हणून घोषित करण्यात आले. परंतु त्यांना आठवड्यातून एक दिवस पोलिस स्टेशनला हजेरी 
देण्यास फर्मावले. त्यांना कोणताही जामीन लागला नाही . त्यांनी फक्त केस पूर्ण होईपर्यंत बाहेर गावी जाऊ नये व इतर कायदेशीर अटीही त्यांना सांगण्यात आल्या. आता काका मोकळे होते. त्यांनी इन्स्पे. डावलेंचे आभार मानले .  त्यांना त्यांनी वाकून नमस्कार केला. तेव्हा डावले म्हणाले, " अरे एवढा मोठा बनवू नकोस मला. मी माझं कर्तव्य केलं कोणीही तुला माफीचा साक्षीदार केलं असतंच. अशा रितीने आभार प्रदर्शन संपल्यावर ते घरी जाण्यासाठी वळले. तर समोरच त्यांना सोना आणि साधना आलेल्या दिसल्या. सोना धावत येऊन त्यांना बिलगली. " आता 
घरी येणार ना ? " त्यावर त्यांनी तिला कुरवाळत म्हंटले, " नक्कीच ,पण तुझ्या मम्मीला चालेल ना ? "   तेव्हा सोना म्हणाली, " असं नाही म्हणायचं. तिला नाही चाललं तरी तुम्ही घरी यायलाच पाहिजे. " त्यावर साधना फक्त हसली. मग ते तिघे साधनाच्या घरी गेले. काकांचा राहण्याचा प्रश्न सुटला होता. पण एकदा तरी घरी जाऊन आलंच पाहिजे. म्हणजे नीताच्या रागाला वाट तरी मिळेल. त्यांना रमेशच्या घरी
असण्याची कल्पना नव्हती . त्यामुळे या गांभिर्याची त्यांना जाणिव नव्हती. उद्याच्या पेपरात केसबद्दल सगळं येईलच. लगेचच  नीताला भेटायला 
जावं का नाही, त्यांना कळेना. केव्हाही  गेलं तरी तिच्या नकारार्थी बोलणं ऐकावच लागेल. त्यांनी या बाबतीत साधनाचा सल्ला घ्यायचं ठरवलं. 
तिचा सल्ला कशासाठी घ्यायचा , तिचा या गोष्टीशी संबंधा नाही. जाताना सोनाला बरोबर घेउन गेलं तर , नीताच्या बोलण्याची धार थोडी कमी होईल. नाहीतरी मित्राच्या मुलीचा उल्लेख आपण केलाच होता. मग त्यांनी हे सगळे विचार बाद करून टाकले. सोनाला नेणं म्हणजे क्रिमिनल केसला जवळचा नातेवाईक नेण्यासारखं होतं. कुठलं तर्कट त्यांनी  कुठेही लावलं. नीता म्हणजे कोर्ट थोडंच होतं. असो. अशा विचित्र विचारांमध्ये ते साधनाच्या घरी पोहोचले. गेल्या गेल्या सोना म्हणाली, " मम्मी आज आपण बाहेर जेवायला जाऊ. काका सुटून आलेले आहेत. आपण सेलिब्रेट करायलाच हवं. साधनाला ते फारसं  आवडलं नाही. पण ती काहीच बोलली नाही. ते पाहून सोना काकांना म्हणाली, " आपण ना  त्या हॉटेल गुडडे मध्ये जाऊ या. " ते हो म्हणाले, पण त्यांनी खुणेने तुझ्या मम्मीला विचार असे सुचवले. 
                                                    आज प्रथमच काकांना स्वस्थता वाटत होती. साधना चहाचे कप घेऊन बाहेर आली . ते पाहून ते म्हणाले,
" साधना मला खरंतर घरी जाऊन यायला हवं. उद्या पेपरात बातमी आली की कदाचित नीता जास्तच चिडण्याची शक्यता आहे. " त्यावर ती 
म्हणाली, " मी काय बोलणार ? तुम्ही ठरवा. आता तुमच्या मागच्या रोजच्या कटकटी तरी थांबल्या.  मात्र तुम्ही कुठे राहायचं हे ठरवावं लागेल. "     काकांना आश्चर्य वाटून ते म्हणाले, " म्हणजे मी इथे राहू नको का ? "   साधना काहीच बोलली नाही. इकडे तिकडे करणारी सोना 
मध्येच येऊन म्हणाली, " आता काका कुठेही जाणार नाहीत. " ......... म्हणजे साधनाला अजूनही आपल्याबद्दल विश्वास वाटत नाही तर. त्यांचं 
हिंदोळणारं मन पाहून साधना म्हणाली, " म्हणजे आपलं लग्न होईपर्यंत तुम्ही कुठे राहायचं असं मला म्हणायचं होतं. तुम्ही तुमच्या घरचं सगळं 
निपटून आलात की मग खरोखरीच स्वतंत्र झालात असं म्हणता येईल. एकदा तो तटका तोडून या म्हणजे झालं. आपल्या मध्ये पुन्हा पुन्हा 
तुमच्या मागच्या आयुष्यातले संदर्भ यायला नकोत. " ...... काकांना त्यातही थोडं हायसं वाटलं. म्हणजे ती लग्नाला तयार आहे हे नक्की. 
मग त्यांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी घरी जायचं ठरवलं. नाहीतरी सामान आणावंच लागणार होतं. रोहिणीची  एक ट्रंक आपली एक बॅग एवढ्या आठवणी तरी हव्यातच. पण नीताने त्या दिल्या पाहिजेत. अजूनही त्यांना रमेश आल्याचं  माहीत नव्हतं. आजचा दिवस मात्र चांगला गेला. 
गेल्या सात आठ वर्षांचा आढावा घेता  काकांची अनिश्चितता संपुष्टात येऊ लागली होती. संध्याकाळी ते सगळेच बाहेर फिरायला गेले . ते जेव्हा 
साधनाच्या घरी आले तेव्हा साठे मामांनी मात्र त्यांना येताना पाहिलं होतं. त्यांना आश्चर्य याचं वाटलं , की काही दिवसांपुर्वी साधनाला त्यांनी या 
गृहस्थांचा संबंध काय असं विचारल्यावर तिने उत्तर देण्याचं टाळलं होतं. तरीही ते काकांना दरोड्याशी संबंधित असल्यामुळे ओळखत नव्हते. 
साठे मामांनी मात्र मनोमन ठरवलं की आता त्यांना जर हे गृहस्थ साधना बरोबर राहणार असतील तर मेंटेनन्सचं बिल वाढवावं लागेल आणि त्या निमित्ताने साधनाचा त्यांच्याशी काय संबंध आहे तेही कळेल. साठेच ते, लवकरच त्यांनी चौकशी करावयाची ठरवली. संध्याकाळचं फिरणं ही एक  बऱ्याच वर्षातून काकांना मिळालेली पर्वणी वाटली. रात्री बोलणं वेगवेगळ्या विषयांवर झालं. पण लग्नाबद्दल साधना एक अक्षरही बोलली नाही, की त्यांच्या इथल्या राहण्याबद्दलही. ते झोपी गेले. साधनाशी सलगी आजच करणं त्यांना बरं वाटेना आणि घरच्या झोपेचं एक सूख असतं तेही त्यांना टाळावंसं वाटेना. वेगवेगळ्या विचारांमध्ये सकाळ उजाडली. चहा नाश्ता झाल्यावर काकांनी साधनाला घरी जाऊन येतो असं सांगून ते बाहेर पडले. पण त्यांना अचानक भीती वाटू लागली. रमेश घरी नसणारच याची त्यांना खात्री होती. म्हणजे नीताचे विरोधी शब्द 
ऐकले की झालं. असं त्यांनी स्वतःच्या मनाला बजावलं. तरीही त्यांना रुखरुख वाटू लागली. जाताना श्रेयासाठी ते खाऊ घेऊन जाण्यास
विसरले नाहीत. बसमधला वेळही उत्साहात गेला. पण बिल्डिंगच्या गल्लीच्या तोंडाशी आल्यावर मात्र त्यांच्या तोंडाला भीतिने कोरड पडली. 
त्यांना जाऊ नये असं वाटू लागलं . इतके काय आपण घाबरतो. आपलं वय नीताच्या वयापेक्षा कितीतरी जास्त आहे. लहान मुलासारखं आपण 
घाबरू लागलो तर आपण यापुढे जगू शकत नाही. आत शिरावं किंवा नाही या विचारात ते गल्लीच्या तोंडाशी घुटमळत राहिले. नेमकं रघुमलचं 
लक्ष गेलं. आणि तो त्यांना दुकानातू हाका मारू लागला. इतर  कोणी बघू  नये म्हणून ते पटकन त्याच्या दुकानात शिरले. बातमी जरी सगळ्यांनी वाचली असली तरी हेच ते कामथे हे कोणालाच माहीत नव्हतं. बहुतेक सगळे नवीन होते. आल्या आल्या रघुमलने त्यांचे स्वागत केले. " अरे काकाजी चाय पिओ नी. तुमी वापस आला लई चांगला जाला. ते तुमचा डिक्रा आनि डिक्रिबी आली घरी. "   न कळून काका म्हणाले
" म्हणजे ? "   .... त्यावर रघुमल म्हणाला, " अरे असा काय करते,  रमेश भाई  अने निलू बेनबी हाये "   अचानक काकांच्या तोंडात चहा फिरायला लागला. मग घाबरत ते म्हणाले, " तू पाहिलयस का त्यांना ? " ....... "अरे सौ टका काकाजी. पण तुमी घबरते कशाला . तेनी तुमाला 
ठेवला नाय तर मी ठेवेल. ".  
                                              ते रघुमलचा निरोप घेऊन त्यांच्या बिल्डिंगकडे निघाले. कपाळावरचा घाम पुशीत ते चवथ्या माळ्यावर आले. 
दरवाज्याची बेल वाजवली. आणि त्यांना पुन्हा एकदा मागे वळून पळून जावंस वाटलं. पण दरवाज्या एका स्त्रीने उघडला. दारात निलू उभी होती. त्यांना न ओळखून निलू म्हणाली, " कोण पाहिजे ......? " मग तिला अचानक आठवलं. चेहरा ओढलेला असला तरी डोळ्यात तीच ओळख होती. तिला ती जाणवली . आणि म्हणाली, " बाबा , तुम्ही ? ...... या ना आत ". आत मधून रमेश आणि नीता डोकावले. निलूचा मुलगा आणि श्रेया  आत  खेळत  होते. आत आलेल्या काकांकडे नीता नुसती पाहत बसली. पण या म्हणाली नाही. रमेशची प्रतिक्रिया काही वेगळी नव्हती. तोही काहीच बोलला नाही. काका आत शिरले. सोफ्यावर बसले. त्यांना श्रेया कुठे आहे विचारण्याचं धैर्य झालं नाही तिच्यासाठी घेतलेलं चॉकलेट खिशात विरघळत होतं. काकांची मान खाली होती. आतून रमेश आला. त्याला पाहून काका काही बोलणार एवढ्यात तोच 
म्हणाला, " मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आणि काहीही ऐकायचंही नाही. तुमच्यासारखा  माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. 
चोऱ्या आणि दरोडे घालण्याचंच बाकी  होतं. तेही केलत. पेपराचे रकानेच्या रकाने तुमच्या कारागिरीने भरलेले आहेत. आणखी किती मान खाली घालायला लावणार आहात कोण जाणे. तुम्ही आता इथे राहू शकत नाही. तुमचं सामानसुमान जे असेल ते घेऊन चालायला लागा. " त्याला तोडीत निलू मध्ये म्हणाली, " रे पण ते जातील तरी कुठे ? " . ....... " का ? तुला पुळका आलाय , जा  त्यांना घेऊन अमरावतीला. गुन्हेगारी जगात आता त्यांचं नाव गाजतंय. कुठे जाणार ? अवघं जग त्यांना मोकळं आहे. " (अवघे विश्वची माझे घर, वेगळ्याच अर्थाने खरं  ठरत होतं. ) ...... काका खाली मान घालून नुसतेच बसले होते. काय बोलायचं जिथे कोणी ऐकायलाच तयार नाही . रमेशच्या तोंडावर इतकी तुच्छता होती की , त्यांनी काही हालचाल केली असती किंवा ते बोलले असते तर त्याने मारायलाही कमी केलं नसतं. असं वाटून ते थिजल्यासारखे बसले होते. त्यांना लहानपणची आठवण झाली. त्यांची आई फार शिस्तप्रिय होती. ती ओरडायला लागली की  लहानशी हालचाल देखील ते करायला घाबरत असत. याला आपण लग्न करणार आहोत असं सांगितलं  तर हा गावच गोळा करील. मध्येच श्रेया बाहेर डोकावली. पण तिला नीताने मागे खेचली. आता सामान कसं गोळा करणार ? आणि सांगणार कसं की ते कोणाकडे राहणार आहेत . बरं झालं 
सोनाला आणली नाही. ही तर कोर्टातल्यापेक्षा वाईट अवस्था होती. ....... त्यांनी मग बोलायचा प्रयत्न केला. " मी ... मी बोलू का ? त्यांनी भीत
भीत विचारलं ." पण त्यांचं न ऐकता रमेश आत गेला. नीताही आतच बसून राहिली. निलू म्हणाली, " काहीतरी सांगणार होतात . " इतके वर्षांनी ते दिसत असल्याने ती गंहिवरली. त्यांनी आपल्याला जवळ घ्यावं असं तिला वाटू लागलं. तर त्यांना  तिने आपली विचारपूस करावी असं त्यांना वाटलं. प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही. मग त्यांनी धीर करून निलूला आपण सामान घ्यायला आल्याचं सांगितलं. निलू आत गेली. 
आतून रमेशचा आवाज  येत होता. काय घ्यायचंय ते घ्या , म्हणावं पण मला बोलायला सांगू नका. निलू बाहेर येत म्हणाली, " काय काय हवय 
तुम्हाला. "   घरातून हाकलून दिलेल्या माणसाचा भाव काकांच्या तोंडावर होता. मग ते गॅलरीतल्या कपाटाकडे गेले. ते उघडून त्यांनी आतले 
काही कपडे घेतले. पैसे तर किक्ला केव्हाच घेऊन गेला होता. निलूला त्यांनी वरची एक ट्रंक आणि त्यांची जुनी  बॅग  त्यांनी आणायला सांगितली. मग त्यांनी खिशात हात घालून श्रेयाला चॉकलेट देण्यासाठी ते निघाले. पण हाताला विरघळलेले चॉकलेट लागल्याने त्यांनी खिशातच हात कसातरी पुसून , तो विचार बाजूला सारला. ते दोन्ही बॅगा आणि पिशवी घेऊन निघाले. मागे वळून देखील त्यांनी पाहिलं नाही. 
निलूला सुद्धा ते जवळ घेऊ शकले नाहीत. खरतर ती बऱ्याच वर्षांनी त्यांना दिसत होती. ते लिफ्टजवळ आले आणि श्रेयाने हाक मारली, " आजोबा ..‌....."   . त्यांनी मागे वळून पाहिलं. पण रमेशने तिच्या तोंडावर हात ठेवलेला दिसला. आता मात्र त्यांना लक्षात आलं की त्यांची
रक्ताच्या नात्यांना गरज उरली नव्हती. ते डोळ्यातलं पाणी मागे सारीत साधनाच्या घरी जाण्यासाठी निघाले. .........
                                                              साधनाकडे तर ते पोहोचले. आता साधनाची पाळी होती , की यांच्याबरोबर आयुष्य काढायचं नक्की 
ठरवायल हवं. वेगवेगळी आंदोलनं चालणाऱ्या मनाला स्थिर करणं तेही वास्तवाचा विचार करून घट्ट बनवणं इतकं सोप नव्हतं. मग तिने स्वतः
पुरता विचार केला. आपण यांना स्वीकारलेलं आहे मग विचार स्थिर का होत नाहीत. यांना आपण कोणत्या कारणांनी नाकारतोय. तिने कारणं शोधायला सुरुवात केली. तिला नक्की कारण सापडत नव्हतं. याचाच अर्थ आपण फक्त भितोय, असं तिच्या लक्षात आलं. जे काही वाईट व्हायचं होतं ते सगळं होऊन गेलेलं आहे. मग उगाच पाय मागे का घ्यायचा . कामं करता कारता असले विचार करणं कठीण होतं. नकळत 
काकांसाठी चहा बनवताना तिने चुकून दोनदा साखर घातली . तिच्या ते लक्षात आलं नाही.,,,,,म्हणजे आपल्याला भविष्याबद्दल फक्त चिंता आहे . तीही खोटी . कारण आपण लग्नाचा निर्णय ताबडतोब घेतलेला नाही. जसा तिने तो  तिच्या नवऱ्याच्या बाबतीत घेतला होता. त्यामानाने तिने आत्ता लग्नाच्या निर्णयाप्रत यायला भरपूर वेळ घेतला  होता . हे तिच्या लक्षात आलं. इतकं मंथन केल्यावर तिने विचार करणं सोडून दिलं . आता फक्त" आर या पार " खरंतर  "पारच."  आता तिच्याजवळ दुसरा विकल्प नव्हता. आणि विचारही भरपूर करून झाला होता. आता आपण लग्न करायचं म्हणजे करायचंच. नंतर तिच्या लक्षात आलं, की सोनालाही  ते घरात असणं फार महत्त्वाचं वाटत होतं. चहा गाळून तिने तो हॉलमधे आणला. काका थोडे निराच मनस्थितित बसले होते. तिच्या लक्षात आलं की मुलाकडे काहीतरी गंभीर घडलेलं आहे. ती चहाचे कप घेऊन त्यांच्या शेजारी येऊन बसली. तिने हळूवारपणे विचारले, " रमेश फार बोलला का ? " ...... आपला चेहरा साफ करीत ते म्हणाले, "
साधना तो बोलला असता तर बरं झालं असतं. म्हणजे त्याला लग्नाबद्दलही सांगता आलं असतं. आणि तिथे निलूही आली होती. "   मग थोडा वेळ जाऊन  देऊन म्हणाली, " मग तर फारच छान झालं. तिला आता तुम्हाला वेगळं सांगावं लागणार नाही. आणि तिने परिस्थिती पाहिलीच आहे. सोडून द्या. मागचं सगळं विसरून आपण नवीन सुरुवात करू या. " त्यांनी चहाचा कप तोंडाला लावला होता. तिला वाटलं, साखर जास्त 
झाल्ये म्हणून ते तक्रार करतील. पण चालू वास्तव त्यांनी स्वीकारलं असल्याने तशी तक्रार केली नाही. आता मीठ जास्त काय आणि साखर 
जास्ती काय. आपलंच आहे. ते तोंडावरून नॉर्मलला आल्यासारखे वाटले. त्यावर ती म्हणाली, " आपण आज गणपतीचं दर्शन घेऊ, आणि प्रथम त्याला आपल्या लग्नाला येण्याचं बोलावणं करू, कशी वाटते आयडिया ? " ते तिला जवळ घेत म्हणाले, " फारच छान. पण जाताना सोनालही 
घेऊन जायला हवं. " नकळत ती त्यांना बिलगली. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवीत ते काही वेळ तसेच बसले. सगळंच नक्की झाल्याने 
आयुष्याचे नवे रंग उद्यापासून पाहायला मिळतील याची त्यांना खात्री वाटू लागली. रमेश , नीता, निलू, श्रेया, दरोडा, किशाची टोळी हे सगळंच त्यांनी आता विसरण्याचं ठरवलं. ते त्यांनी भूतकाळात जमा केलं. आता भूतकाळ फक्त संदर्भासाठीच वापरायचा आणि एरव्ही विसरायचा.
अशा अनेक चांगल्या विचारांनी त्यांच्या मनाला उभारी आली. अचानक पाऊस थांबला आणि लख्ख ऊन पडलं. थोडं गरम होऊ लागलं. पण 
सगळं कसं स्वच्छ झाल्याचा त्यांना साक्षात्कार झाला. ते शांतपणे सोफ्यावर लवंडले. त्यांना नावं ठेवणारी आता नीता समोर नसणार होती. 
आता हे घर त्यांचं स्वतःचं झालं होतं. सगळ्याच वस्तू नव्याने झळकत असल्याचा त्यांना भास झाला. लग्नापूर्वी एखादी मुलगी सासरी जावी 
आणि नव्या घराच्या आपलेपणाने हरखून जावी तशी त्यांची अवस्था झाली. 
                                                              लवकरच चांगला दिवस पाहून त्यांनी नोंदणी पद्धतीने  लग्न केलं. त्यात साधनाला ओळखणारे काही जण आणि काकांना ओळखणारा म्हणून रघुमल आणि त्यांचा एक जुना मित्र जगन्नाथ मिरगीकर एवढेच उपस्थित होते. वधूवरांचं त्यांनी अभिष्ट
चिंतन केलं . एक लहानशी पार्टी एका हॉटेल मध्ये दिली. फरक एवढाच होता. त्यांची मुलगी सोना आपल्या आईवडीलांच्या लग्नाला हजर होती. साठेमामांना बातमी लागली, त्यावर ते म्हणाले, " साधनाबाई तुम्ही अगदी पत्ता लागू दिला नाही. काही का असेना सोसायटीच्या 
इंकममध्ये वाढ झाली. " त्यावर सगळे हसले. केस बद्दल अर्थातच कोणीच काही  बोलले  नाही. आता काकांचा  केसशी संबंध सध्या तरी पोलिस स्टेशनला हजेरी देण्या इतपतच होता. अशीच दोन तीन वर्ष गेली . एकदाची केस कोर्टात उभी राहिली. लंगडणाऱ्या माणसाच्या गतीने केस 
चालू लागली. साधारणपणे प्रत्येक तारखेला काकांना जावं लागे. त्यांचा जबाब कोर्टापुढे नोंदला जाईपर्यंत त्यांना जावं लागणार होतं. असे
इन्स्पे. डावले म्हणाले. त्यांचीही बढती होऊन ते बदलून गेले. पण केस करता त्यांना यावं लागत असे. प्रत्येक तारखेला सूर्या आणि त्याचे सहकारी येत असत. तो  काकांकडे सूडाच्या भावनेने पाहत असे. पण आता तो काहीही करू शकत नव्हता. त्यामुळे काकांना भीती नव्हती. सूर्या आणि इतर यांनी  कोणीतरी "गोंड " नावाचा वकील केला होता. तो  गुन्हेगारांच्याच केसेस लढत असे.  केसच्या प्रगतीची सुरुवातीला 
बातमी पेपरात येत असे. पण काकांना कधीही नीताने फोन केला नाही. रमेश परत कॅनडाला निघून गेला. आता ते इथली जागा विकून सगळेच 
तिकडे कायमचे जाणार होते. काकांना अर्थातच माहीती नव्हती. पण त्यांचा खबऱ्या रघुमल त्यांना भेटत असे म्हणून त्यांना माहीती होत असे. 
हळू हळू त्याचंही भेटणं बंद झालं. कधी कधी सोना कोर्टात जाण्याचा हट्ट काकांजवळ करायची , मग तिला ते समजावीत की ही जागा लहान 
मुलांसाठी आणि चांगल्या माणसांसाठी नाही. अजून बँकेने कोणत्याच खातेदाराचे पैसे परत केलेले नव्हते. रिजर्व बँकेच्या सूचनेनुसार लहान लहान रकमा काढता येत असत तेवढाच काय तो दिलासा. असो. आयुष्या संथ पण सरळ गतीने चालू होतं.  इतक्या वर्षांच्या त्रासानंतर आत्ताचे 
सरळ आयुष्य काकांना आकर्षक वाटत होतं. आता त्यांची तब्बेतही सुधारली. पण श्रेयाची त्यांना अधूनमधून आठवण येत असे. निलूचाही परत 
संबंध आला नाही. तिने तरी निदान आपल्याला फोन करायला हरकत नाही . असं त्यांना सारखे वाटे. मग साधना त्यांना समजावीत असे. 
आता मागे वळून पाहू नका. झालं ते झालं. खंतावत बसून हाती काहीच लागणार नाही. सोनाही मॅट्रिकच्या वर्गात होती. लहान वाटणारी सोना 
आता मोठ्या माणसांसारखी बोलायची. काकांना फार  कौतुक वाटे. मध्येच साधनाला तिच्या मागच्या नवऱ्याच्या भावा कडून पत्र आलं , की 
नवऱ्याच्या नावाची जमीन होती , ती विकली गेल्याने आलेल्या पैशातील वाटा तिला ड्राफ्टने पाठवणार आहे. त्याप्रमाणे तिला अडीच लाख रुपये मिळाले. दिवस पालटत होते. ...............यथावकाश काकांचं कोर्टापुढे स्टेटमेंट झालं. गोंड वकिलाने उलट तपासणीमध्ये काकांना 
पोलिसांनी पैशाचं आमिष दाखवल्यामुळे काका माफीचे साक्षिदार झाल्याचे सिद्ध करायचा प्रयत्न केला. पण कोर्टाला तो दृष्टिकोन पटला नाही. त्या नंतर मात्र त्यांना कोर्टात जावं लागलं नाही. 

                                        दहा वर्षानंतर.............................................
                                        ****************

                                    एक दिवस काकांना इन्स्पे. डावले यांचा फोन आला . " कामथे , उद्या केसचा निकाल आहे, आलात तरी हरकत नाही. 
नाही आलात तरी चालेल. पण तुम्हाला गोवणाऱ्या साऱ्यांनाच कशा शिक्षा होतात ते पाहायला मिळेल. शेवटी जगात न्याय असतोच. " यावेळी
बोलताना त्यांनी अरेतुरे केलं नाही. आता ते आरोपीही नव्हते किंवा भावी गुन्हेगारही. काकांनी जायचं ठरवलं. साधना नाही म्हणतच होती. पण
सोनानेही आग्रह धरला. म्हणून साधना आणि  ते गेले. कोर्ट खच्चून भरलं होतं. नाही म्हणायला साठेमामा आले होते. ते  कसे आले याचं काकांना आश्चर्य वाटलं. बरोबर अकरा वाजता कामकाजाला सुरुवात झाली. काकांचा हा निकालाच्या दिवसाचा दुसरा अनुभव होता. सूर्या , 
गुड्डी , अकडा, सोल्या, इंजिनियर, राजासाब आणि इतर दोघे या सगळ्यांनाच त्यांच्या त्यांच्या गुन्ह्याप्रमाणे शिक्षा झाल्या. सूर्या, अकडा , सोल्या
यांना जन्मठेप झाली. इंजिनियर , राजासाब आणि   इतर दोघे यांना चार ते पाच वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा झाली. गुड्डीला मात्र साधी कैद 
आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा झाली. तो फार मोठ्या गंभीर गुन्ह्यात  गुंतल्याचे सिद्ध झाले नाही.  पोलिसांचे कौतुक झालं. त्यांच्या 
अंगावर मूठभर मास चढलं. निकाल पत्राचं वाचन संपल्याने सगळेच पांगले. तेवढ्यात कोणाचंही लक्ष नाही असं पाहून बेड्या घालणाऱ्या हवालदराचे लक्ष विचलित झाल्याचे पाहून सूर्या काकांच्या अंगावर धावला. दात  ओठ खात म्हणाला, " साल्या तुझ्यामुळे आमची ही अवस्था 
आहे. त्याने त्यांचा गळा धरण्याचा प्रयत्न केल्याने इन्स्पे. डावले आणि इतर पोलिस त्याच्या अंगावर धावले आणि त्याला जेरबंद केला. मग मात्र 
काका साधनासहीत कोर्टरूममधून त्वरेने बाहेर पडले. पुन्हा मागे वळून त्यांनी पाहीलं नाही. त्यांना त्यांचेच शब्द आठवले. सोना बेटा ही जागा 
लहान मुलांसाठी आणि चांगल्या माणसांसाठी नाही. ते लहान नव्हते. पण चांगले होते हे परिस्थितीनेच सिद्ध केले म्हणून बरे झाले. कोर्टाबाहेर 
आल्याबरोबर त्यांना वार्ताहारांनी गराडा घातला. पण कसे तरी त्यांना हात जोडून ते चक्क पळाले. टॅक्सी पकडून ते घरी आले. 
सोना  आज घरीच होती. तिने काय झालं विचारलं. तिला आता मात्र सगळं सांगणं भाग होतं. ती आता मोठी झाली होती. मग तिने आपला 
मनसुबा बोलून दाखवला. " मी कायद्याचा अभ्यास करणार  आणि न्यायाधीश होणार, म्हणजे मला  रोज कोर्टात जाता येईल. " काका हसले. 
तिला जवळ घेत म्हणाले, " हरकत नाही बरं. " 
                                                                 
                                                      आता मात्र काकांचं मन मुंबईच्या आणि सुटकेच्या विचारांच्या गर्दीत हरवून गेलं. 

  

                                                                (सं               पू               र्ण )
                                                                  ***************************