ह्यासोबत
- आखाती मुशाफिरी (१)
- आखाती मुशाफिरी (२)
- आखाती मुशाफिरी (३)
- आखाती मुशाफिरी (४)
- आखाती मुशाफिरी (५)
- आखाती मुशाफिरी (६)
- आखाती मुशाफिरी (७)
- आखाती मुशाफिरी (८)
- आखाती मुशाफिरी (९)
- आखाती मुशाफिरी (१०)
- आखाती मुशाफिरी (११)
- आखाती मुशाफिरी ( मध्यंतर )
- आखाती मुशाफिरी (१२)
- आखाती मुशाफिरी (१३)
- आखाती मुशाफिरी (१४)
- आखाती मुशाफिरी (१५)
- आखाती मुशाफिरी (१६)
- आखाती मुशाफिरी (१७)
- आखाती मुशाफिरी (१८)
- आखाती मुशाफिरी (१९)
- आखाती मुशाफिरी (२०)
- आखाती मुशाफिरी (२१)
- आखाती मुशाफिरी (२२)
- आखाती मुशाफिरी (२३)
- आखाती मुशाफिरी (२४)
- आखाती मुशाफिरी (२५)
- आखाती मुशाफिरी ( २६ )
- आखाती मुशाफिरी ( २७ )
- आखाती मुशाफिरी ( २८ )
- आखाती मुशाफिरी ( २९ )
- आखाती मुशाफिरी ( ३० )
तिथून सुटका झाली याचंच हायसं वाटून घेत मी गाडी सुरूं केली. खरंच मी उद्या त्यांच्याकडे जेवायला जाणार होतो कां?--------------------------------------------------------
शुक्रवार उजाडला.
जाग आली तेंव्हा सकाळचे आठ वाजत आले होते.पण खिडकी बाहेर, माध्यान्ही असांवे तसें लख्ख ऊन पडलेले. सुटीच दिवस म्हणायचा पण दैनिक कामांप्रमाणे साप्ताहिक कामे करावी लागत ती वाट पाहात होती. आस्थापनेकडून निवासा साठीं दोघांत मिळून एक अशी सदनिका दिली गेली होती. प्रत्येकी एक स्वतंत्र स्वयंपूर्ण शयनखोली, अभ्यागत कक्ष आणि भटारखाना मात्र सामाईक. माझा सहनिवासी एक केरळी होता. माझे त्याच्याशी कधी पटलें नाही. जरा सणकीच होती वल्ली. सुटीच्या दिवशी भल्या सकाळी स्वारी त्याच्या इतर ज्ञातीबांधवांकडे निघून जायची, ती रात्री उशीराच परतायची. त्यामुळे घरी मी एकटाच. साप्ताहिक कामें म्हणजे निर्वातक-झाडूने घर साफ करणे, आठवडाभ्रर मळवलेले कपडे धुलईयंत्रातून खंगाळून काढणे मग न्याहरी आणि त्यानंतर निवांत अंघोळ. पण आज झडझडून कामाला लागावे असें वाटत नव्हते.
पठाणांचे सेनापतित्व स्वीकरल्यापासून झालेल्या शारिरीक आणि मानसिक श्रमाने गळाठा आल्यासारखे झाले होते. पण दूरध्वनीची घंटा घणघणली तसा पांघरूण भिरकावत उठावेच लागले. कोण तडमडला आता, म्हणत फोन घेतला तर दोनच शब्द ऐकायला आलेले. " येऊ कां? " लहान पणी आजीकडून भुताच्या गोष्टी ऐकतांना त्यातले एखादे भूत असेंच विचारायचे. त्यावेळी आजी खर्जातला असा कांही आवाज काढायची की काळजाचा एक ठोका चुकलाच म्हणून समजा. हा आवाजही तसाच होता. पण टरकी बिरकी वाटण्यातला नव्हता. उलट आज तरी वैतागायला लावणारा होता. " ये " म्हणण्याखेरीज गत्यंतर नव्हते. तो आवाज वश्या डोंगर-याचा होता.
लौकिकात या आसामीला वसंत गडकरी असें नामाभिमान होते. तो एकटाच येणार नव्हता सगळी ’परदेशस्थ सडेफटिंग युनियन’ माझ्याकडे धुडगूस घालायला येणार होती. वश्या त्या युनियनचा आद्य प्रवर्तक होता. त्याचं काय झालं की मी नवीनच जेंव्हा या देशांत आलो तेंव्हा फार हुरहुरल्यासारखं (होमसिक) झालं होतं. जागा, वातावरण, माणसे सगळंच नवीन. मुलांची, पत्नीची, घराची आठवण सतत मनांत जागती असायची. कुठून ही परदेशी येण्याचे अवदसा आठवली असं वाटत रहायचं. एकतरी मराठी माणूस बोलाचालायला मिळावा असं वाटायला लागलं. मी जरा तशी चौकशी केली तर एका केरळ्याने एका नॅशनल हॉटेल नावाच्या जागेचा पत्ता दिला.
परदेशस्थ भारतीयांचे एकमेकांची भेंट घेण्याची ते एक मेलनस्थळ (त्या केरळ्याच्या शब्दांत ’रान्देवू’) होते. एका शुक्रवारी मी अधिरतेने तिथे गेलो तर, एका रस्त्याला दोन फांटे फुटून इंग्रजी वाय आकारात झालेल्या रस्त्यांच्या बेचकीत एक टपरीवजा हॉटेल आणि त्याच्या बाहेर अनेक माणसें घोलक्या घोळक्याने गप्पा छाटीत उभी असलेली. मी जत्रेत चुकलेल्या माणसासारखा उगीचच इकडून तिकडे भटकू लागलो. इतक्यात, " काय मुंबईकर कधी आल्ले कतारले ?’ असा एक घणाघाती वैदर्भीय आवाज कानावर आदळला. आवाजाचा उगम, सदरा-तुमानीत बळेंच कोंबून बसवलेली असावी अशी एक देहयष्टी होती. मी मुंबईकर आहे हे या सदगृहस्थाला कसे कळाले असावे हा प्रश्न मला पडला पण भांबावण्या पलिकडे माझी दुसरी कोणतीही अवस्था होणे शक्य नव्हते. आणि मग ’ या इकडे ’ म्हणत त्या इसमाने माझा हातच धरला आणि एका घोळक्याकडे घेऊन गेला.
जवळपास माझ्याच वयाचे सहा सात तरूण गप्पा मारीत उभे होते. आम्ही जवळ जातांच एकाने विचारले, " काय गडकरी, पाहुणे कोण ?" " जांवय शोधायले आल्ले. पोट्टीये थ्यांची लग्नाची, करतोस ?" आणि त्यापाठोपाठ एक हास्यक्ल्लोळ. (इथे मला पुलंच्या रावसाहेबांसारखं ’हांग अस्सं’ असं ओरडावसं वाटलं) आपली नाडी, गण, गोत्र, प्रवर इथे बरोबर जुळणार याची खात्री झाली. पण मग विनोदाचा तास संपला आणि रितसर ओळखीचा कार्यक्रम झाला. पुढें अनेकदा नॅशनलपाशी गांठीभेटी आणि मग माझे निवासस्थान शुक्रवारी सहसा रिकामे असतें म्हणून ’अड्डा’ इथे जमायला लागला. त्यांतही त्यांनी सामग्री आणायची आणि पाकसिद्धी मी करायची असा कबुलिनामा होता. कारण त्यातले त्यांत सुगरणीचा स्वयंपाक मीच करू शकत होतो.
त्या जमावात नागपूरचा हा वश्या-वसंत गडकरी (त्याच्या आकारमानामुळे त्याला ’डोंग-या’ ही संज्ञा लाभलेली होती) होता, सोलापूरचा किशा-किशोर करपे होता, कुडाळचा पेशवा-माधव महाबळ होता, मुंबईचा श-या-शरद गांगल आणि कोण कोण होते. आता सगळी नांवे आठवतही नाहीत. पण त्या मित्र मंडळीनी मला जें कांही दिलं त्या आधारावरच मी तो तीन वर्षांचा वनवास सुखेनेव भोगला हे मात्र नक्की. एक एक करत अड्ड्याचा कोरम पूर्ण झाला. मी किती दमलो आहे ते न सांगताही कळत होते. भटारखानाचा ताबा वश्याने घेतला. वडाभात करतो म्हणाला. किशोर कोशिंबीरीच्या पाठीमागे लागला. आणि मग सगळेजण कांही ना कांही करू लागले. शरदने तर माझे कपडेसुद्धा धुतले. या सा-या करामातींच्या पार्श्वभूमीवर माझ्या गेल्या कांही दिवसांतल्या अनुभवाचं कथाकथन. अगदी थेट पठाणांच्या दावतनाम्यापर्यंत. त्यात मधून मधून त्यांची टिप्पणी चालूच. किशा तर एकदा उसळून कडाडला, " तुलाच लेका नसती कुलंगडी गळ्यात बांधून घ्यायची हौस. ही हिरोगिरी करायची काय गरज होती ? चार पाट्या टाकायच्या आणि गप पडायचं. नाही तरी तो रब्बानी का फब्बानी, काय वेगळं करीत होता !" पेशवा म्हणाला " ते जेवायला बिवायला मुळीच जायचं नाही हां, सांगून ठेवतो."शरदने तर माझ्या त्या हाडाच्या सापळ्याला मूठ माती देण्याच्या कल्पनेची कल्पनेची यथेच्च टिंगल केली. म्हणाला. " च्यामारी, या भोटमामाला (हे माझं टोपणनांव) आपण एवढं ग्रेट मानतो पण हे येडं असा कधी कधी बावळटपणा काय करतं रे. बरं झालं त्या पठाणाने याची शेंडी उपट्लीन तें !" " पेशव्या, तू काय सांगतं बे याले जेवाले जाऊ नको म्हणून? तुला काय वाटते, हा जाणार नाही? हा भोटमामा काय सांगतो बे, थे पठाण याच्या वास्ती भाकरी गिकरी करतीन म्हणून.मी सांगतो, लिहून ठेवा बाप्पाहो, हा तिथे हड्डी गिड्डी चघळाले मिळन म्हणून चाल्लाहे, लाळ गाळीत. याचा काय भरोसा नै भौ!" इति वसंतराव गडकरी.
तेंव्हा पठाणांच्या वसतीवर जेवायला जाण्याचा माझा विचार बहुमताने धिक्कारला गेला.मी माणुसकीची, विश्वबंधुत्वाची भलामण निकराने केली. पण एकही हरीचा लाल माझ्या बाजूने उभा राहीना. संध्याकाळचे चार वाजायला आले तसें हें चित्रविचित्र पक्षी आपापल्या कोटरी परतण्यास सिद्ध झाले. मात्र मी गनीमी काव्याने पठाणास फितुर होईन या आशंकेने, मशारनिल्हे वसंत गडकरी आमचे अंगरक्षक म्हणुन नेमले गेले. त्या भोजनाला जाण्या पूर्वी मला एक काम करावयाचे होते. त्याची वाच्यता मी अद्याप केलेली नव्हती. ती केली असती तर या माझ्या मित्रमंडळींनी मला खाटेला बांधूनच ठेवले असते. ते काम म्हणजे सरकारी रुग्णालयात जाऊन आजारी मोईनखानचा समाचार घेणे. त्यालाही वसंतरावांनी कडाडून विरोध केलाच. पण अखेर तयार झाला.
कतारमधे त्यापूर्वी खाजगी वैद्यकांना वैद्यकी करण्याची मुभा होती. पण तिथे राजेशाही होती आणि राजेशाहीचा एवंगुण विशेष लहरीपणा याला अपवाद नव्हता. आले राजाजीच्या मना तेथें कुणाचे चालेना, असा खाक्या तिथेही होताच. कोणत्याही गोष्टीला मज्जाव करावयचा झाला, तर एक फतवा काढला की झाले! एके काळी भारतीयांना वाहन चालवण्य़ाचा परवाना, त्यांचा भारतीय वाहन चालवण्याचा परवाना ग्राह्य मानून लगोलग दिला जात असें. पण असाच एक फतवा निघाला आणि भारतीयांना तेथील शासकीय संस्थेतून एक महिना वाहन चालविण्याचे शिक्षण घेणे अनिवार्य केले गेले. खाजगी वैद्यक असेंच एका फतव्यानिशी बरखास्त केले गेले. इतकेच नव्हे तर भारतीय भिषग्वर्यांना केवळ अठ्ठेचाळीस तासांची मुद्त देऊन हद्दपार करण्यात आले. त्यामुळे शासकीय रुग्णालयाला पर्याय नव्हता.
मोईनखान ज्या रुग्णालयात दाखल केला होता तेथील अवस्था शासकीय रुग्णालयात जशी असावी तशीच होती. ब्रिटीशांच्या प्रभावाने बाहेरील जग झकपक झाले होते. कारण ते मूळ, प्रथमश्रेणी देशवासियांच्या उपभोगासाठी होते. त्यांचे एवढेसें दुखले खुपले तर सरळ विमानांत बसून भारत गांठणे त्यांना शक्य होते. मुंबईला पंचतारांकित रुग्णालयात मोठ्या मिजाशीने उपचार घेणारे अरब आम्ही पहात होतोच. द्वितीय, तृतीय श्रेणी आणि विशेषत: अनिवासी परदेशियांसाठी अशी शासकीय रुग्णालये निर्माण केली गेली हेंच पुरेसे होते. येमेन, युगांडा, झिम्ब्वाब्वे, आर्मेनिया, अशा देशांतुन आयात केलेले सुमार अकलेचे नीम-हकीम असे वैद्य (डॉक्टर्स) आणि अत्यंत अल्प वेतनावर काम करावयास तयार झालेले केरळी, फिलिपिनी परिचारक आणि परिचारिका. तेथे बरें होऊन घरी सुखरूप गेलेल्या रुग्णांपेक्षा, एखाद्या सांसर्गिक रोगाचा शिक्का मारून हद्दपार (डी-पोर्ट) केले गेलेल्या रुग्णांचेच दाखले अधिक. काविळीचा किंवा पीतज्वराचा शिक्का बसला तर मग विचारायलाच नको. आपल्याकडे कुष्ठरोग्याच्या वाटेला येणारी निर्भत्सना कितीतरी सौम्य वाटवी अशी निर्भत्सना तशा रुग्णांच्या वाट्याला येई. पन मोईनखानला उपचार देणारा वैद्य गोव्याचा होता. डेरिक अलेमाव त्याचे नांव होते. फतव्या नंतर या गृहस्थाने नाईलाजाने सरकारी नौकरीचा पर्याय स्वीकारला होता.
मोईनखानला घरीच घेऊन जा असा त्याने आग्रह धरला.नाही तर तोही हद्दपार केला गेला असता. नाईलाजाने मी तो मान्य केला. वसंताला आधी हें सारे अजिबात आवडले नव्हते. मी अजूनही कांही तरी अगोचरपणा करतो आहे अशीच त्याची धारणा होती. पण मोइनखानची असहाय्य अवस्था पाहून तोही द्रवला. खानाला घेउन मी वसंतासह वर्तमान पठाण वसाहतीवर दाखल झालो तेंव्हा मोईनखानला माझ्यासोबत पाहून त्यांनी जो जल्लोष केला तो पाहून वसंता सर्दच झाला. त्या आसंमंतातून शिजू घातलेल्या खाद्यपदार्थाचा दरवळ येत होता. पठाणी सहभोजनासाठी आता वसंताही मजबरोबर थांबणार होता.क्रमश: