आखाती मुशाफिरी (२२)

  " सांगतो माऊली. सगळं सांगतो. आधी आंत तर चला " असं म्हणत मी दार उघडलं आणि वश्याला घरांत घेऊन गेलो.

-----------------------------------------------------------------------------------------------

"हां बोल आता."
घरांत गेल्या गेल्या वश्या म्हणाला. मी वश्याला थोडक्यात सध्याच्या माझ्या कामाची माहिती दिली आणि बॅटी दिवसाच्या शेवटी काय बोलला तें सांगितलं. अर्थात्‌, मात्र मी त्यामुळेच नाराज आहे हे त्याला निराळं सांगावं लागलं नाही.           

वश्या माझं सांत्वन आणि प्रबोधन करूं लागला. एरवी एक अरभाट वल्ली अशीच वश्याची ओळख होती. पण वश्या एक तत्वज्ञ आणि भगवद्‌गीतेचा गाढा अभ्यासक होता. हे फार कमी लोकांना माहिती होतं. तसा तो फार कांही शिकलेला नव्हता. जेमतेम बारावी पास झालेला हा मुलगा केवळ बांधकाम मजूर म्हणून आखातात आला होता   अतिशय चौकस बुद्धी आणि कोणतेही काम प्रामाणिकपणे करण्याची वृती यामुळे गेली आठ वर्षे या देशात निरनिराळ्या नौकर्‍या करत टिकून राहिला होता. या वाटाचालीत अनेक चित्र विचित्र अनुभवातून गेलेला होता. त्यात बर्‍याचदां होरपळलेलाही होता. मात्र हाताला लागेल त्या तत्वज्ञान विषयक पुस्तकाचे वाचन आणि भगवद्‌गीतेचा अभ्यास, चिंतन हा त्याचा प्रत्येक समस्येवरचा तरणोपाय होता.

                         यद्यदाचरति शेष्ठस्तत्तदेवेतरो जन: ।
                         स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥

  वश्यानं हा श्लोक ऐकवला आणि विचारले,
" काय समजले कां भगवान काय म्हणाले तें?"
" भगवान कोण?"  मी बावळटासारखा प्रश्न केला.
" तुझा आज्जा!"
" असं काय करतोस रे. नीट सांग ना. एक तर त्या बॅटीने माझा मूड खराब केला आहे आणि तुला इथे कीर्तन    सुचतंय."
" भोटमामा, भगवान म्हणजे श्रीकृष्ण आणि हा श्लोक गीतेतला आहे"
" श्लोक गीतेतला आहे तेवढं कळलं मला. आणि तू गीतेशिवाय बोलणार तरी काय. ते मरूं दे श्लोकाचा अर्थ सांग."
" सांगतो. ऐक. या श्लोकाचा अर्थ असा आहे की, श्रेष्ट पुरुष जे जे आचरण करतात, ते प्रमाण मानून सामान्य जन   अनुसरतात. नव्हे ते तसें सामान्य जनांनी अनुसरावे."
" म्हणजे तुला काय म्हणायचंय, तो बॅटी श्रेष्ठ आणि मी सामान्य!"
" बघ चिडलास तूं. तुझा प्रॉब्लेम काय आहे माहितीए? हे तुझे चिडणे. प्रश्न, तो श्रेष्ठ की तू सामान्य हा नाही. तो  बॅटी काय सांगतोय तें तुला समजलेले नाही. सब घोडे बारा टक्के या न्यायाने तूं चालतो आहेस. तुझ्या मनांत        गोर्‍यांबद्धल आकस आहे तो तू काढून टाक. तुला या आधी भेटलेले गोरे बेमुरव्वत, बद्‌मिजाज असतील म्हणून काय  सगळेच तसे असतील असं तुला वाटतंय. चुकीचं आहे तें. आणि काय रे, तूं या बॅटीशी कितीवेळ बोललास रे? तासा  दोन तासात एकाद्या माणसाची पुरती पहेचान (ओळख) होते तरी कां."
" अरे पण वश्या, मला एक सांग. मी माझे काम नीट करतो आहे ना? मग हे असे उपटसुंभ माझ्या डोक्यावर कां  लादले जाताहेत? आणि तेही मला आधी न सांगता!"
" अच्छा, म्हणजे तुझी ’मी’ ही समस्या आहे तर! कोण समजतोस तू स्वत:ला. खरं म्हणजे तू आहेस एक एसी  मेकॅनिक. बरोबर आहे? ते काम तुला नेहमी मिळेलच असें नाही. म्हणून तुला एक दोन वेळा वेगळी कामे दिली. ती तू तुझा  भेज्या वापरून चांगली केलीस म्हणून तुला कंपनीने हे काम दिले. पण लक्षांत असूं दे, इथे तू बदली कामगार  आहेस. या कामाचा खरा कामगार आला तर तुला त्याची जागा खाली करून द्यावी लागेल की नाही? आणि समजा  हा बॅटी तो खरा कामगार असेल तर? "  मला निरुत्तर होण्यापलिकडे पर्याय नव्हता. मग वश्याच पुढे बोलू लागला.

"भोटू, तुझा खरा प्रॉब्लेम वेगळाच आहे. कदाचित्‌ तुला स्वत:लाही समजला नसेल."
" तो कसा?"
" सांगतो. तू खरं म्हणजे कंटाळला आहेस."
" म्हणजे?"
" म्हणजे असं की, तूं सध्या जे काम करतो आहेस त्याला तू कंटाळला आहेस. तूं एसी का काय म्हणतात त्या मशीनचा कारागीर आहेस. तुझ्या आवडीचे ते काम तुला सध्या मिळत नाही. त्यामुळे तू वैतागला आहेस. बरोबर? "
" तू म्हणतोस ते खरं आहे. पण या सध्याच्या कामाबरोबरच तेही काम करायला मिळणार आहे. नवीन पॅकेज युनिट  अजून आलेले नाही, पण येणार आहे."
" मग झालं तर. तो पर्यंत वाट पहा. सध्या आहे ते काम करीत रहा. नाही तर, तो बॅटी ते काम करणार असेल तर  त्याला करू देत. तू नसत्या मानपमानाच्या गुंताव्यात कां स्वत:ला अडकवून घेतो आहेस? तूं इथे हजारो मैल कशासाठी आला आहेस? पैसे कमावण्यासाठीच ना? की उत्कृष्ठ कामासाठी पदकं, शील्ड्‌स मिळवण्यासाठी? तुला जी काम दिलं जातं आहे ते इमाने इतबारे कर आणि गप्प रहा. भगवान्‌ श्रीकृष्णांचा गीतेतील एक संदेश सांगतो..."

" कर्मण्येवाधिकारस्ते....! माहिती आहे मला." मी उगाचच मध्ये बोललो.

" नाही. तो नाही. तो वापरून वापरून फार गुळगुळीत झाला आहे. मी सांगतो आहे तो निराळा आहे."

                   तस्मादसक्‍त: सततं कार्यं कर समाचर।
                   असक्‍तो ह्याचरन्‍कर्म परमाप्नोति पूरुष: ॥

" म्हणजे काय? अर्थ सांग."
" सांगतो. सांगावाच लागेल. ऐक - तू आसक्‍तिरहित हो आणि सतत कर्तव्यकर्म करीत राहा. आसक्‍ति म्हणजे हा जो कांही ’मी’ पणा तुला सतावतो आहे तो. तो सोड. कारण आसक्‍तिरहित काम करणारा मनुष्य परमपदाला प्राप्त होत असतो."   

 वश्या नुसताच तत्वज्ञ नव्हता तर मानसशास्त्रज्ञही असावा असें वाटून गेले. माझ्या मनातल्या उद्‌विग्नतेचे कारण त्याला बरोबर समजले होते. आखातात येऊन दोन वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला होता. हल्ली घरची आठवण सारखी येत होती. सुरुवातीला मनाजोगी कामे मिळाली होती. त्यात मन रमले होते. आता ही असली हडेलहप्पीची कामे करावी लागत होती. कारागृहाच्या कामापैकी, त्यासाठी लागणारी संयंत्रे एकदा आली, ती व्यवस्थित लावून झाली की रजा मागावी आणि निदान कांही काळासाठी तरी भारतात परत यावे असं वाटायला लागलं होतं.

दुसर्‍या दिवशी साईटवर पोहोचलो तर बॅटी अद्याप आलेला नव्हता. आता हा कां आला नाही असा विचार करीत होतो तो इदी समोर येऊन उभा राहिला. मला सकाळच्या शुभेच्छा देउन म्हणाला,

" तुझा दोस्त बॅटी तुझ्या आधीच येऊन गेला."
" म्हणजे, आला आणि गेलाही. हा काय प्रकार आहे तें तूं मला सांगशील काय?"
" तो मुख्यालयात जातो म्हणाला. कांही साहित्त्य आणायचे आहे असें कांहीतरी म्हणत होता."

हा माणूस मला न भेटता कां गेला? कोणत्या अधिकारात गेला? मी येईपर्यंत कां थांबला नाही? असें विचार मनात येऊ लागले पण काल वश्याने दिलेले प्रवचन आठवले. त्याला काय करायचे ते करू देत, आपण आपले काम करावे असा विचार करून मी कामाच्या ठिकाणाकडे निघालो. आमची चौकडी येऊन ठेपलेली होती आणि कामाची सुरुवात होत होती. तेवढ्‍यात बाहेर नवीन संयंत्र आलेले आहे अशी बातमी इदीने दिली. मी सुर्वेला बरोबर घेऊन नवीन संयंत्र बघण्यासाठी बाहेर निघालो. बरोबर इदीही होताच. हे आलेले संयंत्र या आधी अलेल्या संयंत्रापेक्षा किंचित्‌ लहान होते. पण त्याला आत आणून कामाच्या जागी नेऊन कसे बसवावयाचे ही समस्या होतीच. कारागृहाच्या मोठ्या दरवाजातून ते आंत येऊ शकणार होते. पण दरवाजाचा आकार ते संयंत्र जेमतेम आंत ढकलता येईल इतकाच होता. क्रेनचा उपयोग करता येणार नव्हता. मी मनाशी एक योजना आखूं लागलो. फॉर्कलिफ्टचा वापर करून संयंत्र खाली जमीनीवर उतरवून घ्यावे.  फॉर्कलिफ्टचाच वापरकरून ते दरवजापर्य़ंत नेऊन ठेवावे आणि फॉर्कलिफ्ट आधी दरवाजातून आंत नेऊन त्याच्याच मदतीने संयंत्र आंत ओढून घ्यावे असा विचार केला. कारण फॉर्कलिफ्टने उचललेल्या अवस्थेत संयंत्र आंत नेणे  दरवाजाच्या अपुर्‍या उंचीमुळे शक्य होणार नव्हते. फॉर्कलिफ्ट आणि संयंत्र हलवण्य़ासाठी कांही लाकडाचे ठोकळे, पहारी इत्यादि मुख्यालयला फोन करून मागवून घ्यावे म्हणून फोन करण्यासाठी इदीच्या कार्यालयाकडे मी वळलो इतक्यात एक छोटी मालवाहू मोटार (pick-up van) घेऊन बॅटी हजर झाला. त्याने कांही सेफ्टीबेल्ट्स, दोर्‍या इत्यादि सामान आणलेले होते. आता तोही मला सामील झाला. मी त्याला माझी योजना सांगितली. मला काय काय लागणार होते ते त्याने नीट समजाऊन घेतले आणि मुख्यालयाला फोन झाल्यानंतर स्वत:च जाऊन सारे साहित्त्य आणण्याची तयारी दर्शविली. त्याचे म्हणणे बरोबर होते. साहित्त्य कंपनीच्या भांडारातून आणावे लागणार होते, जे कारागृहाच्या जागेपासून किमान दहा किलोमीटर दूर होते. मी बॅटीला भांडाराकडे पिटाळले आणि मुख्यालयाला फोन करून कामाची आणि लागणार्‍या साहित्त्याची कल्पना दिली.

क्रमश: