हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२७)... अंतिम








 

                      ॥  श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥ 
   
          


अभंग # २७.

सर्वसुख गोडी साही शास्त्रें निवडी । रिकामा अर्धघडी राहूं नको ॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरिवीण ॥
नाम मंत्र जप कोटी जाईल पाप । रामकृष्णी संकल्प धरूनी राहें ॥
निजवृत्ती हें काढी सर्वमाया तोडी । इंद्रियांसवडी लपो
 नको ॥
तीर्थव्रतीं भाव धरी रे करुणा । शांति दया पाहुणा हरि करी ॥
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवीं ज्ञान । समाधी संजीवन हरिपाठ ॥


भिन्नपाठः   साही = सर्व; रामकृष्णी = कृष्णनामी


हा अभंग म्हणजे "एक अभंगी हरिपाठ"च आहे. हरिपाठावर लिहायला सुरुवात केली तेंव्हा पहिल्या अभंगाचा आस्वाद घेताना मी लिहिले होते...


आधुनिक शास्त्रीय भाषेत सांगायचे झाल्यास हरिपाठ हा "ज्ञानियांच्या राजांचा" अद्वैताची बैठक न मोडता लिहिलेला अध्यात्मशास्त्रातील नामस्मरणसाधनेवरील एक शोधनिबंधच आहे. एखाद्या scientific journal मध्ये जेंव्हा शोधनिबंध प्रसिद्ध होतो तेंव्हा प्रामुख्याने Abstract, Methods & methodology, results आणि शेवटी conclusion  अशा ४  भागात ढोबळमानाने लिहिलेले असते. ह्या धर्तीवर म्हणायचे झाल्यास अभंग#१ हा ज्ञानदेवांच्या शोधनिबंधातील abstract म्हणायला हरकत नसावी. त्यांचे हे लेखन ललितलेखन नसून अध्यात्मविषयातील शास्त्रीयलेखनच आहे हे म्हणायला भरपूर वाव आहे.


हरिपाठात नामस्मरण साधनेची सुरुवात,  
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥
असोनि संसारी जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥

अशी होऊन नामसाधनेने साधक अंतर्मुख होऊन  त्याला २६व्या अभंगात "एकतत्त्व नाम दृढ धरी मना । हरिसी करुणा येईल तुझी ॥"
अशी अनुभूती येऊ लागते. त्याच अभंगात ज्ञानदेव नामस्मरण साधनेतील परिणाम(result)सांगतात,
ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी । धरोनी श्रीहरी जपे सदा ॥


आता २७ व्या अभंगात ज्ञानदेव नामसाधनेवरील शोधनिबंधात  आपले निष्कर्ष (conclusion) देतात. 


         सर्वसामान्यपणे 'देव' ह्या संकल्पनेबाबत दोन वर्ग आहेत. एक वर्ग आस्तिकाचा आणि दुसरा नास्तिकाचा. जीवन जगतांना ह्या दोन्ही वर्गात एक समान धागा आहे. एक म्हणतो गोविंद हवा तर दुसरा म्हणतो आनंद हवा. वास्तविक दोघांनाही हवे आहे ते एकच... ते म्हणजे न संपणारे सुख! दोघांची भाषा मात्र वेगळी आहे आणि ते मिळविण्याची दिशा वेगळी आहे. नास्तिक ते सुख बाहेरून विषयांच्या माध्यमातून मिळविण्याचा प्रयत्न करतो तर आस्तिक तेच सुख आतून देवाच्या माध्यमातून मिळविण्याचा प्रयत्न करतो.
           
सर्वसुख म्हणजेच पूर्णसुख शाश्वत असते, स्वतंत्र असते, अंतर्यामी असते. मुख्य म्हणजे ज्याचे त्यालाच ते भोगायचे असते. विषय मुळातच अपूर्ण आहेत, अशाश्वत आहेत आणि त्यांच्यातून सुख उपभोगायचे तर मन त्याजागी स्थिर होत नाही. मग विषयांतून 'सर्वसुख' कसे मिळणार? एक भगवंतच पूर्ण आहे, शाश्वत आहे. त्याचे विस्मरण झाल्यामुळे आपल्याला त्याच्या ठायी असणाऱ्या गोडीची चव चाखायला मिळत नाही म्हणून आवड नाही. त्यासाठी त्याचे स्मरण हवे आणि हे केवळ नामस्मरणानेच शक्य आहे. म्हणूनच पूर्णसुखाचा लाभ होण्यासाठी क्षणभरदेखील नामाशिवाय राहू नये. ह्या आपल्या म्हणण्याला ज्ञानदेव पुन्हा साही शास्त्रांचा आधार देत आहेत.
          
आपण रोजच्या जीवनात अनुभवतोच की Empty mind is Devil's abode. 'रिकामे मन हे सैतानाचे घर' असे आपण कितीही म्हणत असलो तरी हे रिकामपण घालवण्यासाठी आपण काय करतो?  आपण संसाराचा पसारा वाढवत असतो. कार्यालयात आलो की संगणक चालू आणि त्याबरोबर 'मनोगत', 'चॅटींग' ह्यातून वेळ मिळालाच तर मग काम :)). घरी गेलो की "काय वैताग आहे ह्या कामाचा आणि प्रवासाचा" म्हणत शीण घालवायला दूरदर्शन संच सुरू करून सुखासाठी / आनंदासाठी शोध सुरू करतो. मग हा चॅनल बदल, तो चॅनल बदल करत "काय फालतू मालिका आहेत" म्हणत जेवायला तरी काय केले आहे पाहावे तर तेथेही "काय हे? काही नवीन नाही का?" म्हणत नाक मुरडायचे. परत येऊन मासिक, वर्तमानपत्र (?!) चाळत सामाजिक, राजकीय परिस्थितीचा आढावा घ्यायचा आणि ह्यावर मित्रपरिवारात आपल्या मतांना दामटत बसायचे किंवा घरातील माणसांवर आपला राग काढायचा आणि मग थकल्या- भागल्या मनाने आणि आंबलेल्या शरीराने झोपी जाता जाता दिवसा राहून गेलेले एखादे काम आठवले की म्हणायचे, 'एका क्षणाचीही उसंत नाही. दिवसभर किती काम करतो.' आपल्या आयुष्यातही असेच घडते.
"बाळपणी खेळी रमलो, तारूण्य नासले ।
वृद्धपणी देवा आता दिसे पैलतीर"
ही आपली व्यथा आहे. शेवटी "किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित" असे म्हणत जगाचा निरोप घ्यायचा. पुन्हा आहे तेच. 
             
ज्ञानदेवांना रिकामा अर्धघडी राहूं नको यातून प्रापंचिक गोष्टींत मन अडकविणे अभिप्रेत नाही. ज्ञानदेवांसारखे संत, सद्गुरू आपल्याला असे मार्गदर्शन नक्कीच करणार नाहीत. संतांना अभिप्रेत असलेले सर्वसुख देण्याचे सामर्थ्य फक्त भगवंतात आहे आणि भगवंत नामापासून वेगळा नाही हेही त्यांना माहीत आहे. नामधारकाने अर्धघडीही रिकामे राहू नये म्हणजे अखंड नामस्मरण करीत राहवे असेच ज्ञानदेवांना सुचवायचे आहे. कारण ज्ञानदेवांना (आणि संतांनाही) माहीत आहे की,


लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरिवीण ॥


            आपण सुखासाठी जे व्यवहार करतो, संसाराचा पसारा गोळा करतो ते सर्व 'लटिके' आहे. बरेच जण जग खोटे आहे, नाशिवंत आहे, असार आहे म्हणत वैराग्याच्या खुळचट कल्पना मनात बाळगून जगाकडे पाठ फिरवतात. मी एका संन्यासी प्रवचनकारांना मिथ्या ह्या शब्दाच्या अर्थाबद्दल विचारले असता त्यांनी मला सांगितले neither real nor false. मी मिथ्या ह्या शब्दाचा अर्थ घेतो परिवर्तनशील. तत्त्वता जीव,जग आणि जगदीश एकच आहे. लटिके आहेत ते मानवी व्यवहार आणि खोट्या 'मी'वर आधारित संसार. सृ सरति इति संसार अशी संसाराची व्याख्या केली जाते. सरत सरत जाणारा तो संसार अशी नकारात्मक भूमिका घेण्याऐवजी "जग हे सत्य असून नित्य नूतन आहे" ही सद्गुरू श्री. वामनराव पै ह्यांची वास्तववादी भूमिका स्वीकारून जगणे अधिक हिताचे आहे. सुखाच्या अपेक्षेत जगाकडे पाहिले तर तुकाराम महाराजांचा एक अभंग आपली व्यथा सार्थपणे मांडतो. ते म्हणजे
"किती वेळा जन्मा यावे । किती व्हावे फजित ॥" सुखाचा शोध घेताना जग सुख देत नाही  म्हणण्यापेक्षा विषयांतून सुख घेण्यात आपल्या इंद्रियांच्या मर्यादा आड येतात हे विसरून चालणार नाही. जगात असणाऱ्या गोष्टींचा उपयोग करून मजेत जगा की. आपल्याला भूक लागली असता खायला न देता तत्त्वज्ञान सांगत राहिले तर? मात्र संतांना अभिप्रेत असलेले सुख म्हणजे
'जेथ दुजियाची चाड नाही । इंद्रियांचा पांगू न पडे काही । विषयाविण आनंद हृदयी । निजसुख पाही या नाव ॥'
संतांच्या सुखाचे स्थान आहे...
"सुख एक हेचि ठायी । बहु पायी संतांचे ॥"
"सुख या संतसमागमे । नित्य दुणावे तुझिया नामे ॥"
एकदा का सुखाचे स्थान नक्की झाले की मग ज्ञानदेव त्याच्या प्राप्तीचे उपाय पुढील ओव्यांतून स्पष्ट करतात.


नाम मंत्र जप कोटी जाईल पाप । रामकृष्णी संकल्प धरूनी राहें ॥


             संतांना अभिप्रेत असलेले सर्वसुख देण्याचे सामर्थ्य फक्त भगवंतात आहे आणि भगवंत नामापासून वेगळा नाही. पण मानवप्राणी जन्माला आल्यापासून विषयांत सुखाचा शोध घेत फिरतो आणि
अंती "किती वेळा जन्मा यावे । किती व्हावे फजित ॥" म्हणत जगाचा निरोप घेतो. भगवंताशिवाय सर्वसुखाची अपेक्षा करणे हे संतांना अभिप्रेत नाही. नामाशिवाय भगवंत हाती येणे कठीण आहे आणि संतसंगतीशिवाय नाम मुखात आणि मुखातून मनात भरणे शक्यच नाही. भगवंताला आपल्या जीवनात आणायचा असेल तर नामाशिवाय सुलभ मार्ग नाही. त्यासाठी संतसंग मात्र हवा. संतसंगाचा लाभ मिळण्यासाठी गाठी पुण्यसंचय असावा लागतो. पण कळत नकळत जमा झालेले पापाचे डोंगरच ह्या नामसाधनेच्या आड येतात. अशा अवस्थेत नाम घेण्याचा संकल्प म्हणजे निश्चय करून रिकामपणी तरी नाम घेत राहवे. रिकामपणी नामस्मरणाचा अट्टहासाने अभ्यास केला असता साधकाचे मन हळू हळू एकाग्र होऊ लागते. नामाचे दिव्य अनुभव येऊ लागताच सहजच नामाबद्दल प्रेम निर्माण होऊन नामस्मरणाचा छंद लागतो. त्याचा परिणाम म्हणजे हृदयात असणारा आनंद अंतःकरणात प्रत्यक्ष दिसू लागतो. संत हा अनुभव शब्दबद्ध करतात तो असा,
"अंतरीची ज्योति प्रकाशली दीप्ती । मुळींची जे होती आच्छादिली ॥
तेथीचा आनंद ब्रह्मांडी न माये । उपमेसी देवू काय सुखा ॥
भगवंत हेच सर्वसुखाचे एकमेव साधन आहे हे एकदा स्वीकारले आणि त्याच्या प्राप्तीसाठी नामस्मरण करणे हे साधन नक्की केले की त्या मार्गात येणाऱ्या अडचणींबाबत साधकाला सावध करण्याची जबाबदारीही ज्ञानदेव स्वीकारतात आणि सावध करताना सांगतात..


निजवृत्ती हें काढी सर्वमाया तोडी । इंद्रियांसवडी लपो नको ॥


             नामस्मरणाचा अभ्यास चालू असता साधकाने जे पथ्य पाळायचे असते त्याचा ह्या ठिकाणी ज्ञानदेव उल्लेख करतात.


        स्वरूपाच्या विसरामुळे माणसाच्या ठिकाणी अहंवृत्ति उदय पावते. हीच निजवृत्ति होय. अहंकारातूनच 'मी आणि माझे' आकाराला येते. त्यातच माणूस आसक्त होऊन राहतो. दुसरीकडे, सर्वसुखाची गोडी चाखायला मिळत नाही तोवर, विषयसुखात मन रमते. नाहीतरी 'दुधाची तहान ताकावर' हा मनुष्यस्वभावच आहे म्हणा. काहीतरी निमित्त काढून माणूस विषयसुखाकडे धावत राहतो. यावर उपाय म्हणजे संन्यस्त होऊन राहणे. संन्यस्त होणे म्हणजे 'मी आणि माझेपण विसरले ज्याचे अंतःकरण । पार्था तो संन्यासी जाण निरंतर ॥' असा संन्यास ज्ञानदेवांना अभिप्रेत आहे. म्हणजे भगवंतच आहे आणि जे काही आहे ते भगवंताचेच आहे अशी भावना दृढ करणे. ही भावना दृढ करण्यासाठी


तीर्थव्रतीं भाव धरी रे करुणा । शांति दया पाहुणा हरि करी ॥


             हाच एक उपाय आहे. वास्तविक नामात रंगलेल्या साधकाला तीर्थव्रताची गरज नाही. कारण भगवन्नाम हे सर्व तीर्थांचा व व्रतांचा राजा आहे. पण नामाचा चांगला अभ्यास करण्यासाठी मात्र तीर्थव्रतांची आवश्यकता आहे. आपण नाही का पदवी घेऊन व्यवसाय सुरू केला तरी conferences attend करतो. आपल्या व्यवसाय बंधू-भगिनींशी वैचारिक देवाणघेवाण करून आपली व्यावसायिक समज आणि ज्ञान वाढवून पुन्हा नव्या जोमाने व्यवसाय करतो. अगदी तसेच तीर्थाटनांमध्ये निरनिराळ्या संतांची, नामधारकांची भेट होते, आत्मचर्चा होते आणि आपल्या जीवनाला आध्यात्मिक वळण लागते.
            भगवंतप्राप्तीसाठी चित्त शुद्ध असणे फार आवश्यक आहे. चित्त शुद्ध झाल्याची खूण म्हणजे करुणा, दया, क्षमा, शांती ह्या दैवी गुणांची अंतःकरणात वृद्धी होणे.
"दया क्षमा शांति । तेथें देवाची वस्ती ॥" हे तर आपल्याला लहानपणापासूनच ऐकायला मिळते. खालील अभंग ह्या दैवी गुणांचा साक्षात्कारच करवतो.
"निवैरता सर्वांभूतीं । दया शांति आणि करूणा ॥
केली कृपा नारायणे । ऐशी चिन्हें उमटता ॥"
              नामस्मरणाने चित्तशुद्धी सहजच होते आणि अंतःकरण दैवी गुणांनी भरून आणि भारून गेले की अशा अंतःकरणात भगवंत प्रगट होतो. तुकाराम महाराजांनी तरी वेगळे काय सांगितले?
"बैसोनी निवांत शुद्ध कऱी चित्त । तयां सुखा अंत नाही पार ॥
येवोनी अंतरी राहिल गोपाळ । सायासाचे फळ बैसलिया ॥"
            
किंवा
"नलगें सायास जाणें वनांतरा । सुखें येतो घरा नारायण ॥"
या दैवी गुणांचे संवर्धन केले तर माणसाचे मनच तीर्थ बनतें आणि भगवंत स्वतःच आनंदाने वास्तव्य करतो.


          शेवटच्या ओवीत ज्ञानदेव नामसाधनेतील आपला अनुभव सांगतात,


ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवीं ज्ञान । समाधी संजीवन हरिपाठ ॥


             ज्ञानदेव स्वतः ज्ञानी होते, योगविद्येत पारंगत होते. योगमार्गाने आणि ज्ञानमार्गाने जे साधायचे ते भगवंताच्या नामानेही सहज साधता येते हेंच ज्ञानदेवांना हरिपाठाच्या अभंगातून सांगायचे आहे.
             योगाच्या अभ्यासाने जी समाधी साधली जाते तिला ताटस्थ्य समाधी म्हणतात. नामाच्या द्वारे जी समाधी मिळते ती संजीवन समाधी. पहिल्या समाधीत योगी आपला 'मी' स्वरूपात विरवून टाकतो. त्या अवस्थेत त्याचा देह निश्चेष्ट राहून त्याची सर्व इंद्रिये तटस्थ असतात. काही वेळाने ह्या समाधीचा भंग होतो आणि योगी पुन्हा देहभानावर येतो. 
              नामस्मरणाने मिळणारी समाधी ही संजीवन समाधी आहे. या समाधीत साधकाचा 'मी' स्वरूपात विरून जात नाही, इंद्रिये तटस्थ होत नाहीत तर याच्या उलट त्याचे आनंदघन स्वरूप त्याच्या ज्ञानरूपात प्रगट होऊन जाणीवेची सर्व अंगे आनंदाने भरून टाकतात. या स्थितीत साधकाचा 'मी' आनंदस्वरुपात डुंबतो.
           या समाधी स्थितीत साधकाची इंद्रिये तृप्त व शांत झालेली असतात व त्याचा देह पूर्ण कार्यक्षम असतो. या संजीवन समाधीत असणारा नामधारक जगात राहून जगापासून अलिप्त असतो आणि लौकिक दृष्ट्या तो इतर सर्व माणसांसारखा दिसत असला तरी तो त्यांच्यापेक्षा आगळा असतो.
ज्ञानदेवांनीच वर्णन केले आहे,
" ते चालते ज्ञानाचे बिंब । अवयव सुखाचे कोंब ॥"


              ज्ञानदेव सांगतात हरिपाठाने संजीवन समाधी मिळते. हे ज्ञान मला निवृत्तीनाथांच्या कृपेने लाभले व ते मला सर्वस्वी प्रमाण आहे.
              संजीवन समाधीचा लाभ केवळ नामस्मरणाने लाभू शकतो हा ज्ञानदेवांचा अनुभव तुम्हा-आम्हाला यावा म्हणून ज्ञानदेव आवर्जून सांगतात...


             

हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥"

                     ॥ श्री सद्गुरुचरणी समर्पित ॥


 


ह्याआधीचे अभंग