ह्यासोबत
- १. अध्यात्म : पूर्वभूमिका
- २. निराकाराला जाणण्यात एकमेव अडथळा : व्यक्तिमत्त्व
- ३. चमत्कार आणि रहस्य व ध्यान
- ४. वेळ, अंतर आणि काम
- ५. संसार / संन्यास / भक्तियोग / कर्मयोग
- ६. मन
- ७. पुन्हा एकदा : मन
- ८. भावनेचा गोंधळ आणि पैशाची मजा
- ९. निराकाराचे सर्व पैलू
- १०. काही आध्यात्मिक प्रश्नोत्तरे
- ११. आत्मस्पर्श
- १२. अस्तित्वाशी संवाद
- १३. स्त्री आणि पुरुष
- १४. न्यूनगंड
- १५. गेस्टाल्ट
- १६. (एक) साऱ्या कलहाचं एकमेव कारण : द्वैत
- १६. (दोन) साऱ्या कलहाचं एकमेव कारण : द्वैत
- १७. प्रेम
- १८. मित्र हो!
- १९. सजगता
- २०. हा क्षण
- २१. संगीत
- २२. काल, अवकाश आणि सर्वज्ञता!
- २३. सहल
- २४. या निशा सर्व भूतानां
- २५. (एक) कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन!
- २५. (दोन) कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन!
- २६. देव, दैव आणि श्रद्धा
- २७. स्वधर्म, साक्षात्कार आणि समाधी
- २८. पैसा
- २९. शरीर
- ३०. भोग
- ३१. (एक) स्मृती
ह्या लेखनाचा हेतू मानवी मनात अत्यंत खोलवर रुजलेले स्त्री-पुरुष हे द्वैत दूर व्हावे, स्त्री-पुरुषात समन्वय वाढावा, दोघात संवाद निर्माण व्हावा आणि सहजीवनाची जादूभरी दुनिया सगळ्याना उपलब्ध व्हावी असा आहे
लेखनात स्त्री (किंवा पुरुष) असा उल्लेख स्वतःला स्त्री (किंवा पुरुष) मानणाऱ्या व्यक्तीची मानसिकता असा आहे हे सदैव लक्षात ठेवणे आगत्याचे आहे, रुढ अर्थाने किंवा सर्रास वापरला जाणारा स्त्री (किंवा पुरुष) असा शब्दार्थ अभिप्रेत नाही. लेखनाचा ओघ आणि भाषा सौंदर्य या दृष्टीने स्त्री आणि पुरुष असे सरळ शब्द लिहीले आहेत पण त्याचा अर्थ आधी सांगीतलेला अभिप्रेत आहे. त्यामुळे प्रतिसाद लिहीताना (आणि वाचताना) लेखनाचा हेतू आणि अर्थ दोन्ही लक्षात घेणं आवश्यक आहे नाहीतर या लेखनाचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही
आता मुख्य विषय :
शरीराच्या दृष्टीनी आपली स्थिती ही कार मधे बसलेल्या माणसा सारखी आहे. मानवी मूल जन्मल्यावर त्याचे सर्व प्रथम जेंव्हा लक्ष वेधले जाते तेंव्हा त्याला कळते की आपण शरीरात आहोत. हा बोध इतका सहज आणि नकळत असतो की त्याला वाटते शरीर चालते म्हणजे आपणच चालतो. ज्याप्रमाणे कार चालते आणि आपण स्थिर असतो तशी खरी परिस्थिती आहे. पण स्वतःलाच कार समजल्यामुळे आपणच चालतो आहोत असं वाटतं
आपण शरीराच्या बाहेर देखील आहोत पण सदैव आपण आतच आहोत असं वाटल्यामुळे हा बोध दुर्लभ होतो. तुम्ही आत्ता ह्या क्षणी जिथे बसला असाल तिथे शांतपणे डोळे मिटले तर तुमच्या लक्षात येईल की शरीर बसले आहे आणि आपल्याला कळते आहे; हा कळणारा जे कळते त्यापेक्षा वेगळा असला पाहिजे (आणि आहेच). तुम्ही शरीर बसलं आहे आणि मला कळतं आहे ह्या बोधात आणखी साकल्यानी शिरलात तर तुमच्या लक्षात येइल की हा बोध मेंदूला होत नाही, तुम्हाला होतो आहे. आता इथे थोडी मजा आहे.
तुम्ही शरीर बसलं आहे आणि मला कळतं आहे या बोधात आणखी थोडे स्थिरावलात तर तुम्हाला 'कळतयं पण नक्की कुठे कळतयं' हे सांगणं शक्य नाही हे लक्षात येइल. तुम्ही इथपर्यंत आलात तर मुक्त झालात, तुम्हाला अस्तित्वाची संरचना कळली : इथे फक्त 'घडणं आणि कळणं' आहे; ज्याला कळतयं असा कुणीही नाही म्हणून बुद्ध या बोधाला 'शून्य' म्हणतो. मुक्ती ही 'मी' ची किंवा 'मी' पासून नाही तर 'मी नाही' ही मुक्ती आहे.
असो, आता परत मूळ विषय; मानवी मुलाला, या निराकार बोधाच्या (किंवा जाणिवेच्या) प्रथम झालेल्या उन्मुखते पासून आपण सदैव शरीरात आहोत असेच वाटत राहते. पुढे मग नामकरण, कोणतीही गोष्ट जाणण्यासाठी वारंवार होणारी जाणिवेची उन्मुखता, आणि सभोवतालचे नातेवाइक आणि समाज त्याचा हा समज (की आपण शरीर आहोत) वेळोवेळी पक्का करत रहातात; इथून तुम्ही स्वतःला स्त्री किंवा पुरुष समजायला लागता आणि मग या एकसंध अस्तित्वात द्वैत सुरू होतं
आता अस्तित्वात कोणत्याही प्रकटनासाठी स्त्री आणि पुरुष अशा दोन पोलॅरिटीजची गरज असते हे उघड आहे त्यामुळे दोन प्रकारचे देह निर्माण होणार, त्याला इलाज नाही. पण अस्तित्व हा या दोन पोलॅरिटीज मधला समन्वय आहे, विरोध किंवा कलह नाही हे न कळल्यामुळे किती गोंधळ होतो ते बघा
स्त्रियांच्या (अभिप्रेत अर्थ बघावा) वैषम्याची तीन मूळ कारणं आहेत. रोज करावा लागणारा स्वयंपाक (किंवा घरकाम), जनन आणि सायकल्स. आता शेवटच्या दोन गोष्टी तर निव्वळ नैसर्गीक आहेत; तुम्ही काहीही विरोध केला नाहीत आणि कोणतेही वैषम्य वाटून घेतले नाही तर शरीर विनासायास त्या गोष्टी घडवेल. तुम्हाला तिथे काहीही करायचं नाही फक्त निसर्गाशी सहकार्य करायचं आहे. माझा एक मित्र प्रसिद्ध गायनिक सर्जन आहे तो मला त्यांच्यात प्रचलित असलेला जोक सांगत होता, त्यांच्या ग्रुपमध्ये जर कुणाला हॉस्पिटल मधून कॉल आला तर बाकीचे मित्र म्हणतात 'अरे लवकर निघ नाहीतर तू पोहोचे पर्यंत तिची नॉर्मल होईल!' आता राहता राहतो तो प्रश्न स्वयंपाक आणि घरकामाचा; ती आगदी साधी, सरळ आणि सोईची श्रम-विभागणी आहे. पण या कामातून अर्थार्जन नसल्यामुळे ते काम गौण समजले जाते. खरं तर भोजना इतका हृद्य आणि सोहोळ्याचा विषय फक्त प्रणय किंवा झोप हाच असू शकतो पण त्याचे ओझे वाटल्यामुळे त्यातली मजा निघून जाते. तुम्ही नीट पहा स्वैयंपाक ही अशी गोष्ट आहे की जिथे तुम्ही बॉस असता, कोणतेही अर्थिक परिमाण नसल्यामुळे सृजनाला आणि विवीधतेला हवा तसा वाव असतो, शिवाय नोकरी सारखी तृप्तीसाठी महीना संपायची वाट बघावी लागत नाही, आत्ता भोजन की लगेच तृप्ती! कंटाळा आला तर केंव्हाही आणि काहीही बाहेरून आणता येतं. तुम्ही स्वयंपाकाचा आणि घरकामाचा ह्या दृष्टीनी विचार केलात तर ते सगळं फार रसपूर्ण होतं.
स्त्रियांनी आपल्या वैषम्याच्या निवारणा साठी शोधलेला सर्वोत्तम उपाय म्हणजे आर्थिक स्वावलंबन हा आहे कारण त्यांनी स्वतःचा असा ठाम समज करून घेतला आहे की पुरुषांचे वर्चस्व हे केवळ त्यांच्या हातात पैसा आहे म्हणून आहे. यातून देहाची हेळसांड, सहजीवनाचा उडालेला बोजवारा आणि जिथे सहज श्रम-विभागणी व्हावी आणि सुखाचे सहजीवन व्हावे अशी अपेक्षा आहे तिथे स्वतःसाठी तणाव निर्माण करून ठेवला आहे. घरात पैसा भरपूर पण उपभोगायला सवड नाही अशी परिस्थिती होऊन बसली आहे. मी तर स्त्री-मुक्ती वाद्यांचे विचार एकून थक्क झालो होतो, स्त्री जीवन हा जुलमी पुरुषी समाजानी निर्माण केलेला स्त्रीत्वाचा अपमान आहे आणि प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी पुरुषांना आपण ही काही कमी नाही हे दाखवायचे असा त्यांचा अजेंडा आहे, हा जर दृष्टीकोन असेल तर काय साधणार सहजीवन आणि कशी येणार मजा?
पुरुषांचे (अभिप्रेत अर्थ बघावा) प्रश्न फार मजेशीर आहेत. एक तर भोजन ही अत्यंत निकडीची आणि रोजची गोष्ट त्यात तो स्त्रीवर अवलंबून (आणि या गोष्टीची त्याला वरचेवर जाणिव करून दिली जातच असते) आणि दुसरं म्हणजे प्रणय ही वास्तविकतः दोघाना सारखीच असलेली उर्मी पण ती केवळ त्याचीच गरज आहे ही त्याची करून दिलेली ठाम समजूत (त्यामुळे वाटणारा अपराधभाव किंवा निष्कारण लिनता) या दोन्ही भानगडीत तो जाम वैतागलेला असतो.
अशात त्याला तीन पुरूषार्थ सांगीतले जातात : अर्थ, काम आणि मोक्ष! हे तर फार मजेशीर आहे त्यामुळे मला जरा सविस्तर लिहावे लागणार आहे
आता 'अर्थ' हा पुरुषार्थ साधायचं कायमच दडपण त्याला दिलेलं असतं त्यामुळे जरा उसंत मिळाली की त्याला वाटतं वेळ वाया चालला काहीतरी करायला हवं. अर्थ हा विषय असा आहे की तुम्ही कितीही जरी मजल मारली तरी तुमच्या पेक्षा श्रीमंत अनेक जण असतात त्यामुळे तिथे बहुतेक जण हमखास अपयशी होतात.
दुसरं पुरुषार्थाचे परिमाण 'काम' हे तर फारच गमतीचं आहे कारण मुळातच याचे दोन परस्पर विरूद्ध अर्थ आहेत. समाजमान्य अर्थ स्त्रीची तृप्ती तर अध्यात्मिक अर्थ काम मुक्ती असा आहे त्यामुळे पुरुष या बाबतीत कायम संदिग्ध असतो. एकतर अर्थाचा पुरुषार्थ साधण्याचे दडपण आणि दुसरं म्हणजे प्रणय ही आपलीच गरज आहे ही त्याची समजूत त्यामुळे स्त्री तृप्ती हा त्याला जवळ जवळ अशक्यप्राय पुरुषार्थ वाटतो. दुसऱ्या बाजूनी, भूक आणि झोप या सारखी प्रणय ही नैसर्गीक प्रेरणा आहे त्यामुळे काम मुक्ती हा अध्यात्मिक अर्थाचा पुरुषार्थ ही त्याला दुष्पूर वाटतो. वास्तविकतः प्रणय ही दोघाना आनंद देणारी साधी नैसर्गीक क्रिया आहे आणि तिची उत्कटता ही प्रतिसाद आणि एकमेकांचे ट्युनिंग यावर अवलंबून असते पण त्यात देखील इगो इशू करून त्याची यथावकाश वाट लावली जाते.
असा सगळ्या बाजूनी वैतागलेला पुरुष मग नको त्या दोन बाबतीत पुरुषार्थ दाखवायला जातो : एक म्हणजे राजकारण आणि दुसरे म्हणजे युद्ध! यातून अनिर्बंध सत्तेनी इतरांचे जगणे मुष्कील करणे, भ्रष्टाचार आणि जीवनाच्या अपिरिमीत नुकसाना शिवाय काहीही साधत नाही. काही पुरुष तर वेगळ्या प्रकारे जीव धोक्यात घालून पुरुषार्थ दाखवतात उदा. अमके शिखर सर कर, तमक्या ग्रहावर जा जे पूर्णपणे निरर्थक आणि आयुष्य वाया घालवणारे असते. बाकी जवळ जवळ सगळे निष्कारण आणि काहीही गरज नसताना काहीतरी उत्पादन करण्यामागे किंवा कार्यमग्न राहण्या मागे लागलेले असतात त्यामुळे नैसर्गीक संपत्तीचं नुकसान आणि हजारो लोकांची आयुष्य राबवली जातात.
मोक्ष हा पुरुषार्थ तर सर्वात मजेशीर आहे. एकतर हा पूर्णपणे पुरुषांचा मक्ता आहे अशी पुरुषांनी स्त्रियांची ठाम समजूत करून दिली आहे. महावीरा सारख्या दिग्गजानी तर मोक्षासाठी स्त्रीला पुरुष देहात जन्म घ्यावा लागेल असं सांगून ठेवलयं (जीन सूत्र). खरं तर मोक्षाचा आणि देहाचा काहीही संबंध नाही, मोक्ष ही आपल्या सर्वांची आत्ता या क्षणी असलेली निर्वैयक्तीक स्थिती आहे. आपण स्त्री किंवा पुरुष नाही हे एकदा लक्षात आल्यावर सहज उपलब्ध असलेली आणि आपण त्यासाठी काहीही केलं नाही तरी कायमची लाभलेली अवस्था आहे. तुम्ही कोणत्याही देहात असाल तरी तुम्ही कधीही देह होऊ शकत नाही, आपल्याला देहाची फक्त जाणिव आहे आपण स्त्री किंवा पुरुष नाही हे समजून परस्परांवर अवलंबून असलेल्या या सहजीवनाचा उत्सव साजरा करा, आनंदी व्हा.
संजय