आखाती मुशाफिरी (६)

साईटवर पोहोचलो आणि पाहातो तो काय !
-------------------------------------
         तसा काम संपायला अजून अर्धा तास बाकी होता. कामगार कामाच्या जागेवर होते. सकाळच्या मानाने काम बरेच पुढे सरकलेलेही दिसत होते. पण जेथपर्यंत काम सरकलेले होते त्या टोकापाशी कामगारांचा घोळका एकत्र जमा झालेला होता. काय असावे म्हणून मी माझी गाडी तशीच पुढे त्या ठिकाणा पाशी नेली आणि खाली उतरलो. खोदलेलेल्या चराच्या टोकाला खोदणी यंत्र स्तब्ध उभे. त्याच्या अलिकडे चराच्या दोन्ही तीरावर पठाणांचा घोळका विभागून उभा आणि त्यांची आपसांत काही तरी चर्चा चाललेली. मी पुढे झालो त्यासरशी कांही पठाण मला वाट करून देत बाजूला सरकले. खोदलेल्या चराच्या तळाकडें निर्देश करत त्यानी जें कांही दाखविले ते भयचकित करणारे होते. तिथे एक तुटलेला आणि विस्कळित अवस्थेतला मानवी हाडांचा सांपळा विखरून पडलेला होता. हाडांवरचे मांस जवळ जवळ झडून गेलेले. खोदकामाच्या यंत्राच्या फाळाला लागून ते अवशेष जरासे वर आलेले.ज्यांची संभावना एरवी राक्षस म्हणून व्हायची ते सारे पठाण म्लान  मुद्रेने उभे.

         मी आधी सगळ्यांना जरा दूर् एका जागी व्हायला सांगितले.  एकजण काय़ झाले ते मला विषद करण्यासाठी जरासा पुढे सरकला. मी त्याला हाताच्या इशा़ऱ्यानेच थांबवले. सूर्य मावळतीला अजून बराच वर होता. सेनापती सैन्याच्या तुकडीला सुचना देण्यासाठी जसा संमुख होतो तसा मी त्यांच्या समोर सूचना वजा भाषण देण्यासाठी उभा राहिलो.

        " दोस्तो, एक अज़ीबो-गरीब हकीकत सामने आयी है. कोई तूफान परश्त इन्सानकी ज़मीनमें गढी हुई लाश या लाशके हिस्से हम देख रहे है. ऐसे रेगिस्तानमें ऐसा हादसा कोई नयी बात नही है.  जो हालात, इन्शाल्ला, सामने आये है, उसको  वाज़िब अंजाम दें ये हमारा फर्ज़ ....." माझे बोलणे मध्येच तोडत एक पठाण ओरडला,

 " लेकिन हम क्युं मुरदाफरोशी करे ? क्या पता कौनसी कौमका है बदनसीब. क्या अंजाम देगा इसको. और ये काम हमारा नही. तुम शुरताको (पोलीस) खबर करो. "
 
         मी भानावर आलो. देवाशपथ, त्या पठाणानाने मला एका नव्या संकटातून वाचवले होते. मी भलअत्याच् उत्साहात त्या अवशेषांचे दफन किंवा अन्य कांही वासलात लावण्याच्या विचारात होतो. कायदेशीर बाबीचा मला विसर कसा पडला याचे माझे मलाच आश्चर्य वाटू लागले. तो पर्यंत सुटीची वेळही झाली होती. पठाण आपसुक त्यांना नेणा-या गाडीकडे परतले आणि मी माझ्या केबीनकडे. मात्र कादरखान आणि नुरुलखानला मी मागे ठेऊन धेतले. पोलिसांना खबर करण्यासाठी मी रेडिओ फोन सुरु करणार इतक्यात कादरखानने भिवया उंचावत पृच्छा केली,
 
       " शुरताको फुन करेगा ?" मी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले.
       ".........."
       " लॅ. मकतबको (मुख्यालयाला) इतिल्ला करो "
 
         अरे, किती खरं होतं ते. कां मी इतका भांबावलो होतो ? की अशा मूलभूत चुका होताहेत हे ध्यानातच आलं नव्हतं? किती खरं होतं कादरखानचं बोलणं. मी कोण पोलिसाना खबर देणारा ? ती जबाबदारी माझी नक्कीच नव्हती. ही साईट, ही जागा कंपनीच्या अखत्यारीतली होती. या जागेच्या आवारात अशी कांही घटना झाली तर कायदेशीर बाबींची पूर्तता करणे ही कंपनीची जबाबदारी होती. माझी नव्हे. किती योग्य सल्ला दिला होता त्याने. आणि आम्ही या लोकांना अडाणी समजत होतो. सारासार विचार करण्याची पात्रता आणि सुयोग्य निर्णय घेण्याची क्षमता काय केवळ पुस्तकी शिक्षणानेच येते कां! कादरखानचा सल्ला मला मनोमन पटला. मी मुख्यालयाला फोन लावला. आज जुम्मेरात (गुरुवार), उद्या शुक्रवारची साप्ताहिक सुटी, त्यातून आता संध्याकाळ म्हणजे मुख्यालयात कुणी असेल की नाही शंकाच होती. तरीही अगदी योग्य माणूस फोनवर मिळाला. तो म्हणजे कंपनीचे सर्व विधी-व्यवहार (लीगल मॅटर्स) सांभाळणारा अधिकारी, हुसैनी! हुसैनी पूर्वी पोलिसातच होता. त्याला झालेली घटना सांगितली. तो म्हणाला निश्चिंतपणे घरी जा मी उद्या पहातो काय ते. माझा जीव भांड्यात पडला. कादरखान जर तेंव्हा तिथे नसता तर मी भलतीच बिलामत अंगावर घेतली असती हे नक्की.
          माझे आणि हुसैनीचे झालेले बोलणे मी कादरखानला सांगितले तेंव्हा त्याच्याही चेह-यावर समाधान दिसले. हा एक विषय मार्गी लागला तसा त्याने मुख्यालयात काय झाले याची विचारणा केलीच. मी जे झाले ते सांगताच तो म्हणाला,
 " मा फिकर. कुच सोचेगा. परसो बताएगा "
 " क्या करेगा खान? काम तो होना दूर यहाँ मुसीबतेंही खडी हो रही है"
 " तो क्या मायूस बैठेगा? खान कुच ना कुच करेगा. चलो बेत रो (घरी चला)"

              एव्हाना चांगलं अंधारून आलेलं होतं. मी दोन्ही खान माझ्या गाडीत घेऊन शहराकडे निघलो. त्यांना कामगार-तळावर (लेबर कॅंप) सोडून घरी जाणार होतो. पण त्यांना सोडल्यावर खान जाऊ देई ना. थोडा पहुणचार घ्या. निदान सरबत तरी घ्या म्हणून हटून बसला. म्हणाला,  
 
             "वै (अहो) पठानका मेहमान लाखिदमत (पाहुणचार न घेता) जा नहीं सकता. जाएगा तो बिरादरी हमपर थूकेगा "

             मी थक्क झालो. आणि आम्ही यांना जंगली, राक्षस समजत होतो. त्यांनाही संस्कृती असू शकते आणि तिचा त्यांना अभिमानही असूं शकतो याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता.  माणसाला माणूस म्हणूनच वागवले पाहिजे अशी शिकवण होती, म्हणून मला माणसांबद्धल कणव होती की मला या पठाणांची दहशत वाटत होती. म्हणून मी सामाचा मार्ग चालू पाहात होतो. ही माणसे अडाणी आहेत हे दिसत होतेच. अफगाणीस्तानातील युद्धांमुळे, तालीबानी चळवळीची सुरुवात असली तरी, त्यांनी केलेली नासधूस, जनतेची झालेली ससेहोलपट मी टीव्हीवर, डॉक्युमेंटरीतून पाहिली होती. मुळात हा समाज मूलतत्ववादी, कर्मठ असला तरी ही माणसे बदलत्या, पुढारलेल्या जगाबरोबर कां चालत नाहीत? त्यांनाच इच्छा नाही की सत्तेवरील राजवट अशा सुधारणा घडूच देत नाही? या माणसांना असे रासवट वागण्यातच मौज वाटते की काय? ही खरीच राक्षसें आहेत कां? या माझ्या चिंतनाला इथे छेद जात होता. मी सरबत घेण्याचे मान्य केले तेंव्हा त्यांना झालेला आनंद पाहिला तो मी कधीच विसरू शकणार नव्हतो.
           सरबत घेऊन झाले तर खान जेवून जा म्हणून आग्रह करू लागला. त्याला मात्र मी शक्य तितक्या नम्रपणे नकार दिला. खरी भीती निराळीच होती. मी शाकाहारी माणूस. ते मांसाहारा शिवाय दुसरं काही खात नाही असं ऐकलेलं. पण खानानं माझ्या मनांतली ती भीतीही हेरली असावी.म्हणाला,
          " कोई बात नहीं हुजूर. कलकी दावत कुबूल करो. साग-खबूस (भाजी-भाकरी) खिलाएगा. कल जुम्मा. शामको तुम्हारा इंतजार रहेगा."

           तिथून सुटका झाली याचंच हायसं वाटून घेत मी गाडी सुरूं केली. खरंच मी उद्या त्यांच्याकडे जेवायला जाणार होतो कां?

क्रमशः