ह्यासोबत
- हृदयविकारः १-झटका का येतो?
- हृदयविकारः २-हृदयाघाताची पूर्वसूचना
- हृदयविकारः ३-श्वसनक्षमता
- हृदयविकारः ४-रक्तदाब
- हृदयविकारः ५-रक्तचिकित्सा
- हृदयविकारः ६-रक्तदाबाचे प्रभाव
- हृदयविकारः ७-स्वस्थतेचे निकष
- हृदयविकारः ८-योग-एक जीवनशैली
- हृदयविकारः ९-पहिला दिवस
- हृदयविकारः १०-प्रतिबंधक हृदयोपचारशाखा
- हृदयविकारः ११-हृदयधमनीरुंदीकरण
- हृदयविकारः १२-हृदयधमनीरुंदीकरण
- हृदयविकारः १३-पुनर्वसन
- हृदयविकारः १४-सम्यक जीवनशैली परिवर्तन
- हृदयविकारः १५-मनोगतावरील आरोग्याख्यान
- हृदयविकार-१६ आहार
- हृदयविकार-१७ विहार
- हृदयविकार-१८ व्यायाम
- हृदयविकार-१९ प्राणायाम
- हृदयविकार-२० शिथिलीकरण
- हृदयविकार-२१ तणाव व्यवस्थापन
- हृदयविकार-२२ मनोव्यवस्थापन
- हृदयविकार-२३ धमनी स्वच्छता उपचार
- हृदयविकार-२४ वर्धित बाह्य प्रतिस्पंदनोपचार
- हृदयविकार-२५ व्यसनमुक्ती
- हृदयविकार-२६ दुसरा वसाहतवाद
- हृदयविकार: २७-अ-प्रकारचे व्यक्तीमत्व
- हृदयविकार: २८-एकाकीपणा
- हृदयविकार: २९-एकाकीपणावर उपाय
- हृदयविकार: ३०-कल्पनाचित्रण
हृदयविकार-२१ तणाव व्यवस्थापन
प्रस्तावनाः इथे केवळ हृदयधमनीअवरोध ह्या विकारासंदर्भात चर्चा केलेली आहे. तरीही तिचा उपयोग इतर अवनतीकारक रोगांकरितासुद्धा होऊ शकेल.
श्रेयअव्हेरः हा वैद्यकीय अथवा तणाव व्यवस्थापन विषयक सल्ला नाही. तशी माझी पात्रता नाही. हे केवळ अनुभवातून आलेले शहाणपण आहे.
टीपः इथे अनेक मते, आधाराविना मांडलेली दिसून येतील. ती आधार असल्यामुळेच अस्तित्वात आलेली आहेत. त्यांचेवर चर्चा होऊ शकेल. इथे चर्चेचे प्रयोजन नाही.
आपल्यासोबत कायमच मानसिक तणाव असतात. न सुटणारे प्रश्न, न आवडणारी माणसे, गोंधळ गडबड, प्रदूषण ह्यांचे तणाव एकापाठोपाठ एक आपल्यावर आक्रमण करत असतात. शरीराचा व मनाचाही प्रतिसाद 'लढा वा पळा' (fight or light) स्वरूपाचा असतो. म्हणजे झेपत असेल त्याच्याशी लढा आणि झेपत नसेल त्यापासून पळ काढा. मात्र साऱ्याच तणावांनी एकदम हल्ला बोलताच शरीर वा मन प्रत्येक बाबतीत लढायचे वा पळायचे ह्याचा निर्णय करण्याआधीच ती समस्या येऊन ठेपते आणि मग आपण तिचा सामना करू शकत नाही.
म्हणून एका वेळी एकच समस्या हाताळणे आणि 'लढा वा पळा' चा निर्णय त्वरीत घेणे ह्यामुळे तणावांचे व्यवस्थापन सोपे होते. ह्याकरीता इंग्रजांप्रमाणे 'फोडा व झोडा' तंत्र अवलंबावे. म्हणजे ज्या जीर्ण, असाध्य आणि कायमच सोबत करणाऱ्या समस्या असतात त्यांची भीती स्थगित ठेवावी. त्यांच्यावर निर्णय घेणे पुढे ढकलावे. ज्या थोड्या प्रयत्नांनी सुटण्यासारख्या पण लगेच लक्ष देणे आवश्यक आहे अशा अनेक समस्या एकएक करून सोडवाव्यात. म्हणजे समस्या सुटत असल्याचे पाहून हुरूप येतो.
जे ताण आपण घेण्याची गरज नसते किंवा जे ताण आपण घेतल्यामुळे परिस्थितीत काहीच फरक पडत नाही ते तणाव घेऊच नये. हे समजवण्यासाठी एक गोष्ट सांगितली होती. ती अशी. एक खेडूत आगगाडीतून निघाला होता. त्याला सांगण्यात आले की ३५ किलो सामान एका तिकीटावर नेता येते. त्याहून जास्त सामान सोबत असल्यास सामानाचे तिकीट वेगळे काढावे लागते. म्हणून त्याने स्टेशनवर आपल्याकडल्या साऱ्या सामानाचे वजन केले. ३५ किलो वेगळे काढून ते हातात धरले. उरलेले सामान डोक्यावर घेऊन तो गाडीत बसला. टी.सी. आला. त्याने एकूण सामान पाहिले, मोजले. आणि ३५ किलोहून जास्त सामानाचे तिकीट मागू लागला. इतर लोकही त्यालाच साथ देऊ लागले. खेडूताचे म्हणणे असे की ३५ किलो सामानच मी नेत आहे. उरलेले तर मी माझ्याच डोक्यावर वाहून नेत आहे ना? पण त्याला सामानाचे तिकीट काढावेच लागले. आपल्याला खुडुताचे वागणे तद्दन मूर्खपणाचे वाटेल. पण तणावाच्या बाबतीत आपणही असेच काहीसे वागत असतो. समजा सोसायटीतला केर काढलेला नसेल तर आपण त्याचा ताण वाहतो. त्यासाठी वेगळी माणसे नियुक्त असतात. जबाबदार लोक पाहणी करण्यासाठी ठरवलेले असतात. आपण ताण घेऊनही अचानक काही फरक पडण्यासारखा नसतो. अशावेळी न काढलेला केर आपण पाहिलाच नाही असे वागणे केव्हाही चांगले. म्हणजे तो प्रश्न न सोडवता, केवळ मनावेगळा करणे. हे मात्र शिकूनच घ्यावे लागते.
प्रच्छन्न अभिव्यक्ती हा तणावमुक्तीचा एक मार्ग आहे. आपल्याला जे वाटते आहे ते दुसऱ्याला, इतरांना खुलेपणाने स्पष्ट शब्दात आणि आवाजात सांगता आले पाहिजे. सभ्यतेच्या बुरख्याआड आपण मोठ्याने हसणेही विसरलेलो असतो. अलीकडे नवीन हास्य क्लब निघालेले आहेत. तेथे सगळे मिळून सकाळी मोठ्याने हसण्याचा कार्यक्रम करतात. त्यांचे अनुभवही तणावमुक्तीचेच असतात. घरी एकटेच असतांना आवडते गाणे मोठ्याने, मोठ्या आनंदाने म्हणण्याचा उद्योग करून पाहा. तणाव कमी होतील. एखाद्याचे म्हणणे आपल्याला अन्यायकारक, अपमानकारक अथवा कमी लेखणारे वाटले तर आपण चिडतो. त्यालाही अपशब्द बोलतो. तसे न करता, त्याला त्याचे बोलणे आपल्याला "अन्यायकारक, अपमानकारक अथवा कमी लेखणारे वाटलेले आहे" ह्याची स्पष्ट शब्दात जाणीव करून द्यावी. तो जर आपल्यापेक्षा हुद्द्यानी वरीष्ट असेल, बलवान असेल तर मोठ्याने खिन्न हसून आपली विफलता, विमनस्कता त्याला जाहीर करावी म्हणजे तो जरी बदलला नाही तरी आपली मानसिकता तणावग्रस्त राहत नाही.
अपेक्षाभंगाचे दुःख दारूण असते. अशा वेळी अनेक गोष्टींचा राग येऊ शकतो. आपल्यालाही आणि समोरच्यांनाही. अशा घटना कशा हाताळाव्या म्हणजे तणाव वाढणार नाहीत, कमी होतील, ते रागनियमन ह्या विषयावर मी इथे मनोगतावरच लिहिलेल्या एका लेखात विस्ताराने चर्चिले आहे.
नको त्या गोष्टीत, नको तेवढे तादात्म्य साधण्याची मनाला सवय असते. त्यामुळे अनावश्यक तणाव वाढतात. याबाबतीत मी एक ऐकलेली गोष्ट सांगतो. दोन शिष्य नदीपार कामासाठी आलेले असतात. परततांना नदीला पूर चढलेला असतो. एक गरोदर स्त्री त्यांच्याच तीरावर अडकून पडलेली दिसते. ती त्यांना विनंती करते की 'मला कुणीतरी खांद्यावर घेऊन पलीकडे पोहोचवा हो!' एक शिष्य ते काम पत्करतो. ते नदीपार जातात. ती स्त्री उतरून आभार मानते आणि आपल्या वाटेने निघून जाते. शिष्य चालत चालत आश्रमाजवळ येतात. ज्या शिष्याने स्त्रिला घेतलेले नसते तो दुसऱ्याला म्हणतो, 'ब्रह्मचारी असूनही तू त्या स्त्रिला खांद्यावर उचलून घेतलेस, तुझे ब्रह्मचर्य बुडाले. मी आता हे गुरूजींना सांगणार.' त्यावर दुसरा शिष्य म्हणाला, 'तू तिला अजूनपर्यंत मनात धरून राहिला होतास होय? मी तर तिला नदीकिनारीच खाली उतरवून आलेलो आहे. (म्हणजे तुझेच ब्रह्मचर्य आता बुडालेले असणार!)'. तर मुद्दा हा आहे की कुठलीही गोष्ट झाली तरीही, ती अकारण आपले मन, खूप काळपर्यंत, व्यापून राहत आहे असे लक्षात येताच, ती मनावेगळी करण्यातच तणावमुक्ती साधते.
तणाव घेणे वाईट नाही. मात्र एका तणावाचा पद्धतशीर निचरा केल्याशिवाय दुसरा घ्यायचा नाही असे धोरण ठेवल्यास ते साचत नाहीत आणि त्यांचा मुकाबला समर्थपणे करता येतो. ह्या विषयावर खूप काही लिहीण्यासारखे आहे. इथे मात्र ती साठा उत्तरांची कहाणी ह्या पाचा उत्तरांमध्ये संपन्न करीत आहे.